बाजार समित्या बरखास्त करणारं जुलमी सरकार नकोच: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:48 IST2019-11-13T17:45:23+5:302019-11-13T17:48:42+5:30
आधीच शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी त्रस्त आहे. अशा वेळी असे निर्णय घेणे चुकीचे आहे.

बाजार समित्या बरखास्त करणारं जुलमी सरकार नकोच: धनंजय मुंडे
मुंबई : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सहाव्या ग्रामीण आणि कृषी वित्त परिषदेमध्ये बोलताना दिली होती. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बाजार समित्या बरखास्त करणारं जुलमी सरकार नकोच असे म्हणत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
आजच्या घडीला बाजार समित्यांसंबंधी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी वाजवी दर मिळविण्यासाठी त्या जास्त उपयुक्त ठरत नाहीये. त्यामुळे ऑनलाइन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही सर्व राज्य सरकारांसमवेत चर्चा करत असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली होती.
मात्र त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी याविषयी संताप व्यक्त केला आहे. बाजार समित्या बरखास्त करणार असल्याचे विधान निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार आहे. आधीच शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी त्रस्त आहे. अशा वेळी असे निर्णय घेणे चुकीचे आहे. त्यामुळे असं "जुलमी सरकार नकोच”. अशी टीका मुंडे यांनी केली आहे.