'फडणवीसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:49 IST2026-03-10T18:20:01+5:302026-03-10T18:49:27+5:30
Harshwardhan Sapkal Criticize Devedra Fadnavis: कुणी बिनडोकपणे काही बोललं आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली तर मीसुद्धा बिनडोक ठरेन, असा टोला फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना नुकताच लगावला होता. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनीही देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'फडणवीसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या शाब्दिक जुगलबंदी सुरू आहे. कुणी बिनडोकपणे काही बोललं आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली तर मीसुद्धा बिनडोक ठरेन, असा टोला फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना नुकताच लगावला होता. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनीही देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोण हर्षवर्धन सपकाळपासून बिनडोक सपकाळ, इथपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा प्रवास झालेला असून, मला डोके नाही असे फडणवीस म्हणाले त्य़ाचे आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, या विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सांगून ‘गेट वेल सून फडणवीस’, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
दरम्यान, “देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सर्व कायदे नियम धाब्यावर बसून मनमानी कारभार सुरु असून भाजपाच्या विभाजनकारी राजकारणाला फक्त काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच उत्तर देऊ शकतो. काँग्रेसचा विचारच देशाला तारु शकतो म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षात जो काम करेल त्याला मोठी संधी आहे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा, पक्ष संघटना मजबूत करा, काँग्रेस पक्षाशी नवीन पिढीला जोडा”, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.
यावेळी गॅस तुटवड्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, LPG गॅसचा तुटवडा हा युद्धामुळे उद्धवला असली तरी सरकारकडे कोणतेच नियोजन नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. उगाच विश्वगुरुचा आव न आणता सर्वांशी चर्चा करून गॅस व इंधनचा तुडवडा होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. गॅस अभावी हॉटेल्स, खानावळी बंद पडणे परवडणारे नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.