दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:40 IST2025-02-08T15:39:54+5:302025-02-08T15:40:51+5:30
Delhi Election 2025 Results Live Update: आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे.

दिल्लीत भाजपाचा दणदणीत विजय, अजित पवार यांनी केलं मोदी, शाहांचं अभिनंदन, म्हणाले...
आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे. “दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपला मिळालेल्या 40 हून अधिक जागा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दिल्लीकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाच्या प्रतिक आहेत. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल. चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम शिक्षण, दर्जेदार आरोग्य सुविधांचं, देशाच्या राजधानीचं सर्वांगसुंदर शहर हे दिल्लीकरांचं स्वप्न पूर्ण होईल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार त्यांच्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचंही मोठं योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यासारख्या नेत्यांना पराभूत करून दिल्लीकरांनी भाजप आणि ‘एनडीए’च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील निवडणुकीमधील सुमार कामगिरीबाबत निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळालं आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह तर देशातल्या अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असा निर्धारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.