"दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, वहिनी ते आपल्याला सुद्धा...", सुषमा अंधारेंचं सुनेत्रा पवारांना पत्र, थेट मुद्द्यालाच घातला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 20:55 IST2026-01-31T20:51:50+5:302026-01-31T20:55:29+5:30
Sunetra Pawar Sushma Andhare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडण्यापूर्वी राजकीय घडामोडी घडल्या. त्या सगळ्यांचा उल्लेख करत सुषामा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

"दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते, वहिनी ते आपल्याला सुद्धा...", सुषमा अंधारेंचं सुनेत्रा पवारांना पत्र, थेट मुद्द्यालाच घातला हात
Sushma Andhar Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. हे सगळं घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील राजकारण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेबद्दल शंका आणि संताप व्यक्त केल्या जात आहेत. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दीर्घ पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.
सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांना लिहिलेले पत्र, वाचा जसेच्या तसे
प्रिय सुनेत्रा वहिनी,
आपण खूप कमी वेळा भेटलोय पण जेव्हा कधी भेटलोय अगदी मनापासून. दादांची आणि माझी असंख्य वेळा भेट झाली, पण मी दादांसोबत एकदाही आवर्जून फोटो काढला नाही. चांगल्या लोकांसोबत आपण फोटो काढायला हवेत; ते आपण का काढत नाहीत याबद्दल पहिल्यांदाच पश्चाताप वाटतोय. 28 तारखेला दादांच्या बाबत जे काही झालं ते अकल्पित होतं. शत्रूवरही अशी वाईट वेळ येऊ नये, ती आपल्यावर येऊन ठेपली.
अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागातल्या एका खाटेवर दादांचे निष्प्राण कलेवर निपचित पडले होते. पार्थ दादा (आता तोच आमच्यासाठी दादा) प्रत्येकाला आत न येण्याची विनवणी करत होते, मात्र गर्दीला आवर घालणं अशक्य होतं.
मी फार घायकुतीला येऊन पार्थ दादाला विनंती केली आणि ते मला दादा आहेत त्या खाटेपर्यंत घेऊन गेले. आत तुम्ही उभ्या होतात. शांत.. सुन्न... बधिर...
त्यानंतर बाजूच्याच खोलीत उदयनराजे, जयंत पाटील, प्रफुल पटेल या सगळ्यांच्या समवेत बसलेले पवार साहेब दिसले. मी वाकून नमस्कार केला. बाहेर पडले आणि पुन्हा आपण बसलेल्या बाजूच्या खोलीत येऊन थांबले. तब्बल अडीच तास त्या खोलीत तुम्हाला प्रत्येक माणूस येऊन भेटत होता. विठ्ठल मणियार काका, उदयनराजे, असंख्य आमदार, दादांचे स्वीय सहाय्यक ढिकले, दादांचे अंगरक्षक... सगळ्यात शेवटी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला अन त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री...
कुणाशीच भेटताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. तुम्ही तितक्याच शांत.. स्थितप्रज्ञ बसून होतात.
तुम्हाला न्याहाळत असताना नियती इतका मोठा अन्याय कसा करू शकते असं वाटून वारंवार हुंदके दाटून येत होते. पण तुमच्यासमोर रडायचं नाही असं दटावल्यामुळे गपगुमान आवंढा गिळून होते. अन मग तुम्हीच आपुलकीच्या ओलाव्याने हाक मारली. मी जवळ जवळ झेपावले. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रडले. या दुःखातून तुम्ही कशा सावराल असा विचार करत होते.
....पण 29 ला दादांचा अंत्यविधी होता होता, दादांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली. काय आश्चर्य आहे, दादासारख्या अत्यंत कर्तृत्वान, निर्णय क्षमता असणाऱ्या आणि प्रचंड दूरदृष्टीच्या, कामाचा आवाका असणाऱ्या माणसाची उणीव कुणीही भरून काढू शकणार नाही असं म्हणणारे भलेभले मातब्बर नेते दादाची उणीव भरून काढण्यासाठी वायुवेगाने कामाला लागले!!
माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळं आकलनाच्या पलीकडचं आहे. म्हटलं तर हे अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे. चिता अजून धड शांतही झाली नाही. मृत्यूला उणेपुरे ४८ तास उलटले नाहीत, तोच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हे माणसाच्या नश्वरतेचे आणि त्याच्या क्षणभंगुरतेचे प्रमाण आहे.
वहिनी, समाज माध्यमांवर काही लोक आपल्याकडे बघून "Brutus you too" अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बाजूने आणि विरोधात लिहिलेली मते-मतांतरे वाचणे आणि हळहळणे याच्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात तसेही फार काही नाही.
पण वहिनी, मला मात्र वेगळं वाटतंय. खरंतर अखंड महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. पण या आनंदाला कर्तृत्ववान दादा गमावलेल्या दुःखाची झालर आहे.
वहिनी, खरंतर तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून होत असलेला आजचा शपथविधी हा भावनिक दृष्टिकोनातून चूक वाटत असला तरी दादांनी स्वकर्तृत्वाने जे अफाट साम्राज्य उभं केलं त्यावर कुठल्याही गिधाडांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला पाऊल उचलणे गरजेचेच आहे!
मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर पती निधनाचे दुःख करण्यापेक्षा माळवा प्रांताचे शासक म्हणून उभे राहणे महानायिका अहिल्यादेवी होळकरांच्यासाठी क्रमप्राप्त होते. माळव्याचे आतले आणि बाहेरचे शत्रू कोण आहेत आणि ते कोणत्या थराला जाऊन क्षती पोहोचू शकतात, याची कल्पना अहिल्यादेवींना फार चांगल्या पद्धतीने होती. त्यामुळे सांप्रत प्रथा–परंपरांना फाटा देत त्या धीराने कंबर कसून उभ्या राहिल्या आणि आपल्या सासऱ्याने आणि पतीने उभे केलेले साम्राज्य वाचवण्यासाठी प्राणपणाने लढल्या.
वहिनी, तुम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतोय. वरवर तो क्रूर वाटतोय. मात्र त्याची कारणं लक्षात येत आहेत. दहा दिवस थांबलो असतो, तर काय फरक पडला असता? असं दादावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. ..पण फरक पडला असता! कदाचित दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा सुरू झाली नसती, तर अजूनही दादांचा अपघात घातपात कसा आहे? यावर लोक खल करत राहिले असते!
कदाचित माध्यमांनी पुढचे तीन-चार दिवस दादांच्या जुन्या मुलाखती... दादांनी कुणाला कशी-कशी मदत केली याचे किस्से... दादांच्या सहवासातील काही महत्त्वाच्या लोकांच्या मुलाखती... दादांनी उभे केलेले उद्योग... MIDC... औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग... बारामतीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण केलेले रस्ते वाहतूक व्यवस्था... त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प यावर माध्यमांनी चर्चा केली असती...!
अशा चर्चेतून कदाचित दादांचं कर्तृत्व अजून अधिक उजळून उफाळून वर आला असतं. कदाचित त्याचा फायदा एका फार मोठ्या काळासाठी दादांच्या पुढच्या पिढीला झाला असता पण हे भाजपाला सहन झालं असतं का?
दादा म्हणजे कालातीत नेतृत्व. ते नेतृत्व आणि नेतृत्वाची अफाट दूरदृष्टी ही नुसती अधोरेखित झाले नसती, तर असा अफाट दूरदृष्टीचा नेता अचानक कसा काय गेला की कोणी घालवला याबद्दल लोकांनी अधिक चौकसपणे प्रश्न विचारले असते कदाचित काही व्यक्ती संस्था अडचणीतही आल्या असत्या! कोणी सांगावं अजून चार-आठ दिवस थांबले असते तर कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्रही आल्या असत्या!!
या सगळ्यांना जर फाटा द्यायचा असेल तर दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा तात्काळ घडवून आणणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तितकी दबावाची परिस्थिती सुद्धा निर्माण करणे गरजेचे होतं. अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखी माणसं तयारच होती म्हणा... भाजपाला हवा असणारा दबाव तयार करण्यासाठी पटेल, तटकरे यांची भूमिका तितकीच महत्त्वाची!
वहिनी, अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री होत आहात. विरोधी पक्षातील महिला राजकारणी म्हणून नाही, तर ज्या आपुलकीने आपल्याला वहिनी म्हणून संबोधत आहे त्या नात्याने विनंती करावीशी वाटतेय, "वहिनी सावध असा.
पटेल, तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला "गुंगी गुडिया" समजून मनमानी करायचा प्रयत्न करतील, पण आपण दादांच्या तालमीत तयार झाला आहात. याचा ठसा उमटवण्याची नियतीने आपल्याला संधी दिली आहे. संधी मिळाली तर महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते. आपण त्यास पात्र आहात. आपल्याला मिळालेली संधी ही निव्वळ अनुकंपा तत्वावरची संधी नाही, तर खऱ्या अर्थाने आपल्या नेतृत्वगुणांना न्याय देणारी संधी आहे हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ.
आम्ही दादांचे विरोधक, पण दादांनी विरोधकांबद्दल कधी कपटबुद्धी बाळगली नाही. टीका केली तरी त्याचा कडवटपणा मनात साठवला नाही. पण म्हणून कुणाचं निष्कारण लांगुलचलनही केलं नाही.
दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते. वहिनी, ते आपल्याला सुद्धा माहीत असतील. आपण त्यांचा योग्य तो बंदोबस्त कराल अशी अपेक्षा आहे. वहिनी, विरोधक म्हणून प्रश्न विचारायला आम्ही कायम आघाडीवर असू. पण महिला म्हणून जर कोणी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र भगिनीभाव जपत आपल्यासोबत असू. राजकारणातली ही सेकंड इनिंग यशस्वी ठरो या शुभेच्छा सह..!!
कळावे
-सुषमा अंधारे