संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:49 IST2025-09-27T16:49:08+5:302025-09-27T16:49:22+5:30
Constitution Satyagraha Padayatra: मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन केले आहे, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे.

संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र असे संविधान देऊन सर्व जाती धर्मांना जगण्याचे हक्क व अधिकार दिले, पण मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन केले आहे, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. त्याबरोबरच २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, दसरा आणि रा. स्व. संघाचा शतकपूर्ती दिन आहे. यावेळी युवक काँग्रेस रा. स्व. संघाच्या रेशिम बागेत जाऊन देशाचे संविधान भेट देणार आहे.
सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता वाजता दीक्षाभूमी येथून या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा होत आहे. या पदयात्रेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सर्व ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक, फ्रंटल, सेलचे अध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
महान क्रांतिकारी, देशभक्त भगतसिंग यांच्या जयंती निमित्ताने रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता नागपूरच्या व्हेरायटी चौक ते संविधान चौक पर्यंत भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सांगता संविधान चौकातील जाहीर सभेत होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.