“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:24 IST2025-06-27T20:24:00+5:302025-06-27T20:24:00+5:30
Shaktipeeth Mahamarg: RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे. एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
Shaktipeeth Mahamarg: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही याला तीव्रपणे विरोध दर्शवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शक्तिपीठ महामार्गांत मोठा भ्रष्टाचार असल्याचा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शक्तिपीठ साठी २० लाख कोटींचा कर्ज डोक्यावर घेत आहेत, हे कशासाठी? तर कमिशन काढण्यासाठी. वित्त विभाग असेल किंवा वित्तमंत्री काही असेल, तरी हा प्रोजेक्ट रेटून केला जाईल. समृद्धी महामार्गाचे झाले, तेच इथे करायचे आहे. हा सर्व विषय कमिशनखोरी साठी आहे, समृद्धी महामार्ग होत असताना देखील झाला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, आता तसाच भ्रष्टाचार शक्तिपीठ महामार्गावरून करायचा आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मोर्चात सहभागी व्हायचे का नाही हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील
हिंदी भाषेच्या मोर्चात सहभागी व्हायचे का नाही, हे आमचे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शैक्षणिक धोरणावर निधी कमी केला असल्याने शिकवायला साधनसामग्री नाही. शिक्षकही नाहीत. इतके दुर्दशा झालेली असताना आपण भाषा वाढवत आहोत. या निरर्थकवादापेक्षा मूलभूत शैक्षणिक गरजेवर खर्च व्हायला हवा. मराठी ही मातृभाषा आहे, तर हिंदी राज्यभाषा आहे, आणि इंग्रजी ज्ञान भाषा आहे. एक राष्ट्र, एक भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे हा गोंधळ सुरू आहे. काही काळानंतर हिंदी ही एकच भाषा देशात ठेवण्याचा घाट केंद्र सरकारचा आहे. भारत संशोधनामध्ये मागे पडलेला आहे, हे दिसत आहे. जर संशोधन आणि शिक्षणावर पैसे खर्च नाही केले तर, एक महाशक्ती होण्याचे जे आपले स्वप्न आहे, ते केवळ एक स्वप्न राहील. RSS आणि भाजपाचे एकच लक्ष आहे, एक भाषा, एक निवडणूक, एक देश, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, आपल्या देशात विविधता आहे, आणि ती जपायला हवी. ठाकरे बंधू मोर्चामुळे एकत्र येत आहेत, असे नाही, गेल्या अनेक दिवसांपासून या चर्चा सुरू आहे. घरातला वाद आहे, ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे घटक आहेत, कोणाबरोबर युती करायची त्यांचा प्रश्न आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.