दोन्ही NCP विलीनीकरणावर CM देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले, “अधिकृतरित्या...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:50 IST2026-02-10T15:48:22+5:302026-02-10T15:50:10+5:30
CM Devendra Fadnavis Reaction Over NCP Merger Issue: सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने स्वागत केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दोन्ही NCP विलीनीकरणावर CM देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले, “अधिकृतरित्या...”
CM Devendra Fadnavis Reaction Over NCP Merger Issue: छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे जो विमानतळ होणार आहे, त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. निधी उभारण्याकरता मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ९६ टक्के लोकांनी मान्यता दिलेली आहे. लवकर जमीन अधिग्रहण केले जाईल. साधारणापणे १ जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावे असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर आता सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
आम्ही फक्त शब्दसुमनाने त्यांचे स्वागत केले
सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली वाटचाल करेल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला. विलीनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी त्यात बोलणे योग्य राहणार नाही. जेव्हा वेळ येईल. ते अधिकृतरित्या सांगितले, त्यांच्यात काही ठरले तर मी प्रतिक्रिया देईल. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, जलसंपदा विभागाचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या ठिकाणी ४० प्रकल्प आणि १०० कनॉल १५ हजार कोटी रुपये नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. जे प्रकल्प घेतले आहेत, ते पुढच्या एक-दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात. अंतिम टप्प्याचे काम बाकी आहे. हे जे काही प्रकल्प पूर्ण करणार आहोत, त्यामुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. एकूण आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येईल, अशा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सगळ्या रीजनला याचा फायदा होईल. सगळे अपूर्ण प्रकल्प यात घेतले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.