स्वा. सावरकरांच्या 'अनादि मी.. अनंत मी…' गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार; अमित शाह यांच्या हस्ते गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:52 IST2025-05-27T16:48:02+5:302025-05-27T16:52:40+5:30
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पहिल्यांदाच घोषित केलेल्या 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार २०२५'चा पहिला सन्मान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी... अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात आला आहे.

स्वा. सावरकरांच्या 'अनादि मी.. अनंत मी…' गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार; अमित शाह यांच्या हस्ते गौरव
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पहिल्यांदाच घोषित केलेल्या 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार २०२५'चा पहिला सन्मान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी... अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात आला आहे. या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुख्यमंत्री निवास 'वर्षा' येथे करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्ये यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे रणजित सावरकर, अशीलता राजे, स्वप्निल सावरकर, मंजिरी मराठे आणि अविनाश धर्माधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
#छत्रपतीसंभाजीमहाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘अनादि मी.. अनंत मी..’ या गीताकरिता केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. pic.twitter.com/pPjqWtJJhx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 27, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
प्रचंड आत्मबळ असलेले गीत
या विशेष प्रसंगी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की,"छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची प्रेरणा देते. त्यासोबतच, प्रचंड बुद्धिमत्तेने संभाजी महाराजांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. त्यांनी ग्रंथही लिहिले, कविताही लिहिल्या. म्हणूनच, त्यांच्या नावाने राज्याचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'अनादि मी, अनंत मी...' हे प्रचंड आत्मबळ असलेले हे गीत रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला."