“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:15 IST2025-08-05T14:08:25+5:302025-08-05T14:15:07+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर महायुतीने सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात असले, तरी एका ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.

“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
Raj Thackeray And Uddhav Thackeray: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यातच मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. महायुतीने सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात असून, महायुतीतील नेत्यांनीच याबाबत मोठे विधान केले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राज्यासह राष्ट्रीय पातळीवरही उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालीच तर महाविकास आघाडी टिकणार की फुटणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. यातच महायुतीमधील एक ज्येष्ठ नेत्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत केलेले विधान चर्चेत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढविली असती तर त्यांना जितके यश मिळाले असते, त्यापेक्षा जास्त यश ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवल्याने मिळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
दरम्यान, कुणासोबत पटत नाही, आवडत नाही असे चालणार नाही. २० वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत; पण तुम्ही एकमेकांशी का भांडता? तुम्ही एकत्र कधी येणार? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धवसेनेच्या युतीबाबत प्रथमच भाष्य केले. महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदार याद्या व दुबार मतदानावर विशेष लक्ष केंद्रित करा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे. युतीसंदर्भातील निर्णय घेऊन त्याबद्दल योग्य वेळी बोलेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.