BJP Keshav Upadhye On NCP Merger News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणाबाबत नेमके काय बोलणे झाले, हे माहिती नाही. अशा प्रकारची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती नाही. या दुःखद प्रसंगी याबाबतचे राजकारण करणे योग्य वाटत नाही, नाही तर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो; पण ते करणार नाही. अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते, पण माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. अजित पवार जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, एकत्रीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपसोबत करणार नाहीत का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यानंतर आता भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
शरद पवारांची विश्वासार्हता आणि पवार गटाची अगतिकता
शरद पवार बोलतात आणि त्यांच्या एचएमव्ही — His Master’s Voice — इकोसिस्टीमकडून तेच शब्द कोणताही विचार न करता, प्रश्न न विचारता, अक्षरशः सत्य म्हणून पाजळले जातात. हा आता अपवाद राहिलेला नाही; तो पायंडाच बनला आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पवार गटाकडून जे राजकारण सुरू झाले, ते पाहता खरे तर शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. मात्र तसे न होता, सोयीस्करपणे सुनेत्रा पवार आणि भाजपावर टीकेचे बाण सोडले गेले. हा राजकीय प्रामाणिकपणा नव्हे, तर जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार आहे. या निमित्ताने काही साधे, पण अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होतात, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
भाजपाचे शरद पवारांना ६ अस्वस्थ करणारे प्रश्न
ज्या दिवशी अपघात घडला, त्याच दिवशी पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेला खुद्द शरद पवार यांनी सहमती दर्शवली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणीही अशा चर्चेची मागणी केलेली नव्हती. मग हा विषय इतक्या घाईने पुढे आणण्याची गरज नेमकी काय होती? विलिनीकरणाची चर्चा ही पवार गटाची राजकीय हतबलता होती का? कारण अजित पवार हे रालोआ आणि महायुतीतच राहणार, हे त्या क्षणी स्पष्ट होते. जर विलिनीकरण होणारच होते, तर मग शरद पवारांची तथाकथित धर्मनिरपेक्ष भूमिका कुठे गेली? ज्या भूमिकेचे कौतुक करताना माध्यमे कधीच थकत नव्हती, ती भूमिका अचानक गुंडाळून ठेवण्यात आली का? विलिनीकरणाचा विचार सुरू होता, तर मग केंद्रातील युपीए आणि राज्यातील मविआ यांचे पुढे काय, हा प्रश्न एकाही माध्यमकर्मीला पडला नाही, संजय राऊत यांनाही हा प्रश्न पडू नये? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न… दस्तुरखुद्द शरद पवार यांनी अशी स्पष्ट भूमिका का घेतली नाही की, “सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नको. मी कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या जे निर्णय घेतील ते मला मान्य आहेत. दुखवटा संपल्यानंतरच राजकीय चर्चा करू.” संयम, परिपक्वता आणि नैतिक उंची दर्शवणारी ही भूमिका शरद पवार घेऊ शकले नाहीत, यामागे नेमकं कारण काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Web Summary : Following Ajit Pawar's unfortunate death, NCP merger talks resurfaced. BJP's Keshav Upadhye questions Sharad Pawar's intentions, the timing of discussions, and the neglect of secular principles. He also questions why Pawar didn't prioritize family support over politics.
Web Summary : अजित पवार के दुर्भाग्यपूर्ण निधन के बाद, एनसीपी विलय की चर्चा फिर से शुरू हो गई। बीजेपी के केशव उपाध्ये ने शरद पवार की मंशा, चर्चा के समय और धर्मनिरपेक्ष सिद्धांतों की उपेक्षा पर सवाल उठाए। उन्होंने यह भी सवाल किया कि पवार ने राजनीति से ऊपर पारिवारिक समर्थन को प्राथमिकता क्यों नहीं दी।