“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:20 IST2025-01-12T16:20:48+5:302025-01-12T16:20:59+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. आधीच म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे
BJP Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामावर विश्वास होता. विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला. त्यात आपल्याला फटका बसला. त्यातून आपण खचलो नाही, तर लढलो. संघटनेला आणखी मजबूत करायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात आपल्याला महायुतीची तयारी करायची आहे. पक्षाचीही तयारी करायची आहे. तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवले आहे, आता तुम्हाला सत्तेत आणायचे आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शिर्डीत भाजपाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन शिर्डीत होत असतानाच पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी तूर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम राहणार असले तरी दोन महिन्यांनी संघटनात्मक निवडणुकीनंतर चव्हाण पूर्णवेळ अध्यक्ष होतील. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता, तेव्हाच त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार हे स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ असा नियम आहे.
आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले याचे दुःख झाले
सन २०१९ला आपल्यासोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आपले सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, तेव्हा डोळ्यात पाणी आले होते. दुःख झाले. परंतु, देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. कोल्हापुरात म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केले. पदाधिकारी यांनी जीवाचे रान केले म्हणून आपल्याला यश मिळाले. कार्यकर्त्यांसाठी हे अधिवेशन आहे. महाराष्ट्रात धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी बोलून दाखवली.