BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:50 IST2022-09-14T17:50:18+5:302022-09-14T17:50:34+5:30
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यातील काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले.

BJP Vs Congress: “कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत”
मुंबई: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडोच्या माध्यमातून पक्षात पुन्हा नवसंजीवनी आणण्याच्या प्रयत्नात असताना, गोव्यात काँग्रेसमधील ८ आमदारांनी बंडखोरी करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. यावरून भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा काँग्रेसच्या फुटीर गटाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. गेल्या दोन दिवसात या हालचालींना वेग आला होता. फुटीर काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुटीर काँग्रेस आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. वैध फुटीसाठी दोन तृतीयांश संख्याबळ होत नसल्याने या आठ आमदारांचा भाजप प्रवेश अडला होता. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
...आणि हे भारत जोडायला निघालेत
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. कंटाळून पक्ष सोडणाऱ्या घरातील लोकांना रोखता येत नाही, आणि हे भारत जोडायला निघालेत..., असा टोला काँग्रेसला लगावण्यात आला आहे. दुसरीकडे, फुटीर गटांमध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर केदार नाईक, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस व राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे.
देवाने मला सांगितले: दिगंबर कामत
मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गाऱ्हाणे मांडले, सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसला गत विधानसभा निवडणुकीत लोकांनी ११ जागा दिल्या होत्या. आठ आमदार भाजपमध्ये गेल्याने आता काँग्रेसकडे फक्त तीन आमदार राहिले आहेत. यात कुंकळ्ळीचे युरी आलेमाव, केपेचे एल्टन डिकॉस्टा आणि हळदोणेचे कार्लुस फेरेरा यांचा समावेश आहे. कार्लुस व एल्टन यांनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी करून पाहिला होता, पण त्यांनी प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.