स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:14 IST2024-09-24T13:09:39+5:302024-09-24T13:14:29+5:30
Akshay Shinde Encounter: एन्काउंटर खरे आहे की नाही हे जनतेला माहिती आहे. आंदोलन करणाऱ्या जनतेवर दाखल केलेले गुन्हेही मागे घ्या. - राऊतांची मागणी.

स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर करण्यात आला आहे. वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्याने विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. संजय राऊत यांनी या एन्काउंटर प्रकरणावरून प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.
शंका घ्यावी असाच प्रकार आहे. एखादा अपवाद वगळता इतर एन्काउंटर हे खरे नसतात. अत्याचाराची घटना घडलेली तेव्हा बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या हातात द्या, ही मागणी तेव्हा जनतेची होती. तेव्हा गृहमंत्री अस करता येणार नाही म्हणून सांगत होते. ज्याचा एन्काउंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
एन्काउंटर खरे आहे की नाही हे जनतेला माहिती आहे. आंदोलन करणाऱ्या जनतेवर दाखल केलेले गुन्हेही मागे घ्या. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे हातात बेड्या आहेत, मग तो बंदूक काढून घेऊन गोळ्या कशा काय चालवतो? साफसफाई करणारा मुलगा गोळ्या कशा घालतो? कोणालातरी वाचवण्यासाठी हे सगळे झाले आहे. संस्थाचालक दोषी नसेल तर मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केले, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न पेटलेले आहेत, त्यामुळे त्यांना बाजुला करण्यासाठी ही घटना घडविली गेली, अशी चर्चा आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला.
मला जेवढे अंडरवर्ल्ड माहिती आहे तेवढे गृहमंत्री आणि एन्काउंटर करणाऱ्यांना देखील माहीती नाही. संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्को अंतर्गत का गुन्हा दाखल केला? आरोपीने आपल्या जवाबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचे एन्काउंटर करण्यात आले. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला आणि जनता तिसऱ्या शिंदेचा एन्काउंटर करेल. सरन्यायाधीश यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चहा घेतला, मग कुणाकडून अपेक्षा ठेवायची असा सवाल करत अजित पवार यांच्या बाबत जी सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्यविनोद करतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल उपस्थित केला.