अनेक वर्षांपासून रखडलेले रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:10 IST2026-01-29T11:09:12+5:302026-01-29T11:10:05+5:30
Ajit Pawar News: राज्याच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोस भूमिका घेतली होती. विशेषतः रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरले.

अनेक वर्षांपासून रखडलेले रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरले
मुंबई - राज्याच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोस भूमिका घेतली होती. विशेषतः रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरले. यामध्ये दौंड-बारामती ३८ किलोमीटरचा रेल्वेमार्ग तसेच अहिल्यानगर-बीड-परळी हा २६१ किलोमीटर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी पाठपुरावा केल्याने रेल्वेमार्गांना चालना मिळाली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दौंड-बारामती मार्गाच्या सुरुवातीमुळे बारामती आणि दौंड परिसरातील प्रवाशांना थेट रेल्वेसेवा उपलब्ध झाली. या मार्गावर दररोज ६ ते ८ डेमू आणि मेल/एक्स्प्रेस रेल्वे धावत असून, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. बारामतीसारख्या औद्योगिक व शैक्षणिक केंद्राला मुख्य रेल्वेजाळ्याशी जोडण्याचे हे महत्त्वाचे पाऊल ठरले.
प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर ते बीड आणि पुढील काही भाग मिळून १७१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले. मराठवाड्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. बीड आणि परळीला थेट रेल्वे संपर्क मिळाल्यानंतर प्रवासी वाहतूक, औद्योगिक विकास तसेच शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च चार हजार ९५७ कोटी रुपये असल्याचे अधिकारी म्हणाले.