भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 04:10 IST2020-09-03T04:09:49+5:302020-09-03T04:10:23+5:30
भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात महापुराचा ८२५१ कुटुंबांना फटका
भंडारा /गडचिरोली : मध्यप्रदेशातील सिंचन प्रकल्पांचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका भंडारा जिल्ह्यातील ८ हजार २५१ कुटुंबांना बसला असून ७८ तात्पुरत्या शिबिरात २७ हजार ३४७ नागरिकांनी आश्रय घेतला आहे.तर गडचिरोली जिल्ह्यात जलमय झालेल्या परिसरात पाण्याचे डबके साचण्यासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे व रोगराईला रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
भंडारा जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून वैनगंगेला महापूर आला. तीन दिवस असलेला महापुराचा वेढा आता ओसरला आहे. कृषी विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नजरअंदाजानुसार ७ हजार ५०० हेक्टरवरील पीक महापुरात वाहून गेले आहे. वीज वितरणचे १२५१ रोहित्र बंद पडले होते. त्यापैकी ९० रोहित्र नवीन लावून वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पिकांनाही बसला आहे. पुराच्या पाण्याचा गाळ अनेक गावांमध्ये साचला आहे. त्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय ठिकठिकाणचे पाण्याचे स्त्रोत दुषित झाले आहेत.
पूरग्रस्तांना तातडीने मदत करा - फडणवीस
नागपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ६१ गावांना गत आठवड्यात पुराचा फटका बसला. पेंच आणि कन्हान नदीला पूर आल्याने २२ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्तांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.