साखर कारखानदारांकडून पुन्हा अडवणूक; राज्यातील शेतकऱ्यांचे १२०० कोटी रुपये अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:15 IST2025-03-27T16:15:28+5:302025-03-27T16:15:50+5:30
तोडणी झालेल्या उसाचे पैसे साखर कारखानदार आपल्या सोयीने जमेल तेव्हा देतात.

साखर कारखानदारांकडून पुन्हा अडवणूक; राज्यातील शेतकऱ्यांचे १२०० कोटी रुपये अडकले
सोलापूर : पाण्याच्या टंचाईत वर्ष-सव्वा वर्ष जोपासलेला ऊस तोडणी करून तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी राज्यातील ११९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे बाराशे १२ कोटी रुपये दिले नाहीत. दिवाळी झाल्यानंतर तोडणी झालेल्या उसाचे गुढीपाडवा आला तरी पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ठोस अशी कोणतीच कारवाई साखर कारखान्यांवर होत नसल्याने ऊस उत्पादकांना पैशांसाठी दरवर्षी तिष्ठावे लागत आहे.
सन २०२३मध्ये पाऊस अल्पसा झाल्याने मागील वर्षी जिल्ह्यात व राज्यात सगळीकडे पाण्याची टंचाई होती. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून ऊस पीक जोपासले होते. काहीही करून ऊस पीक आणायचेच, या जिद्दीतून शेतकऱ्यांनी ऊस जोपासला होता. १२-१५ महिने जोपासलेल्या उसाची तोडणी करण्यासाठी एकरी पैसे मोजावे लागतात. म्हणजे लागणीपासून तोडणीपर्यंत शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागतो. मात्र, तोडणी झालेल्या उसाचे पैसे साखर कारखानदार आपल्या सोयीने जमेल तेव्हा देतात.
राज्यातील काही साखर कारखाने दरवर्षी ऊस उत्पादकांचे पैसे पुढचा साखर हंगाम सुरू होताना देतात. उशिराने पैसै देणाऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने दरवर्षीच असतात. याही वर्षी तशीच स्थिती आहे. साखर कारखाने उसाचे पैसे देण्यास तयार नाहीत. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून थकबाकी ठेवणाऱ्या साखर कारखान्यांची माहिती साखर आयुक्त कार्यालयाला पाठवितात. त्यावर सुनावणी होते. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे काही मिळत नाहीत.
दरम्यान, राज्यातील ११९ साखर कारखान्यांकडे १,२११ कोटी थकले आहेत. त्यातील ३५ साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे १७ व १८ मार्च रोजी झाली आहे. त्यावर आरआरसीची कारवाई होईलही मात्र, शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर साखर कारखानदार देतील तेव्हा, हेच आहे.