'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 08:51 IST2025-06-05T08:50:24+5:302025-06-05T08:51:00+5:30
महामार्ग होणार हिरवेगार- गणेश नाईक

'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात गेल्या आठ वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी व ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्षारोपणात किमान दिड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महामार्ग होणार हिरवेगार- गणेश नाईक
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल. पुढील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात १ कोटी झाडे लावण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय जोतिबाच्या डोंगरावही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. ही मोहीम आम्ही नक्कीच यशस्वी करू असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.
बीड, लातूरमध्ये सर्वात कमी वृक्ष लागवड असून तेथील झाडांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबविण्याची सूचनाही फडणवीस यांनी केली. महामार्गाच्या कडेला झाडे लावताना रस्ता रुंदीकरणाचा विचार करावा. तेथे जांभूळ, बहावा, सुरंगी, पिंपळ, वड, कडूलिंब, अर्जून या सारखी देशी व सावली देणारी झाडे लावावीत असे अजित पवार म्हणाले.
संस्थांचाही सहभाग...
- दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व विभागानी जागा तसेच दर्जेदार रोपे निश्चित करावीत.
- वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा.
- तसेच सामाजिक संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घ्यावे.