कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:11 IST2023-05-13T13:10:43+5:302023-05-13T13:11:53+5:30

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते.

Karnatak Result: Kamal Nath's worries rise despite Congress win in Karnataka; Will history repeat itself? | कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

भोपाळ - कर्नाटक विधानसभेचा निकाल अखेर हाती आला असून यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने राज्यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु कर्नाटकच्या विजयानंतरही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना वेगळीच चिंता लागली आहे. भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते याची भीती कमलनाथ यांना आहे. 

या निकालावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. मात्र पराभवानंतरही भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते. फोडाफोडीचे राजकारण करत भाजपा सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकते असंही त्यांनी म्हटलं. कमलनाथ यांच्या भीतीचे कारण जवळपास ३ वर्षापूर्वी मध्य प्रदेशात घडलेल्या राजकीय घटनांमुळे आहे जेव्हा कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. 
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात यश मिळाल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार बनवले परंतु अवघ्या १५ महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसचे २४ हून अधिक आमदार फुटले आणि कमलनाथ सरकारने बहुमत गमावले. विश्वासदर्शक ठरावात अपयश आल्याने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर राज्यात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. भाजपा घोडेबाजार करून सरकार बनवते असा आरोप काँग्रेस तेव्हापासून करतेय. 

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते. कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचे २ प्रमुख दावेदार आहेत. त्यात एस सिद्धारमैया आणि डी शिवकुमार, या दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरूनही मतभेद चव्हाट्यावर आले होते. मुख्यमंत्रिपदावरूनही या दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ आहे. अशीच स्थिती २०१८ मध्ये मध्य प्रदेशात होती. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. त्यात हायकमांडने कमलनाथ यांची मुख्यमंत्रिपदाची निवड केली, ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा झटका बसला आणि त्यांनी दीड वर्षातच पक्षाला रामराम केला. 

Web Title: Karnatak Result: Kamal Nath's worries rise despite Congress win in Karnataka; Will history repeat itself?