"मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र होतो तेव्हा...";आठवलेंनी जागवल्या आठवणी, ऐक्याची पुन्हा हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:55 IST2026-02-28T14:54:40+5:302026-02-28T14:55:48+5:30
'प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, आपण एकत्र येऊ'; रामदास आठवलेंचे रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन

"मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र होतो तेव्हा...";आठवलेंनी जागवल्या आठवणी, ऐक्याची पुन्हा हाक
अहमदपूर (जि. लातूर): "समाजाच्या हितासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा," असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केले. अहमदपूर येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
'उगवता सूर्य' चिन्हाच्या आठवणींना उजाळा
आपल्या भाषणात आठवले यांनी जुन्या युतीच्या आठवणींना उजाळा दिला. "मी आणि ॲड. प्रकाश आंबेडकर जेव्हा एकत्र आलो होतो, तेव्हा आमच्या पक्षाला मोठी मान्यता मिळाली होती आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह मिळाले होते. आता पुन्हा एकदा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. रिपाइं हा केवळ एका समाजाचा नसून सर्व जाती-धर्मांचा पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीवर भाष्य
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना आठवले म्हणाले की, "या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे. केंद्र सरकार यावर लक्ष ठेवून असून लवकरच या अपघातामागचे सत्य समोर येईल."
दिग्गजांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. कार्यक्रमाला रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.