Latur dead body found in suitcase: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका नदीच्या काठावर सुटकेस मिळाली होती. पोलिसांना सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला होता. या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे.
फरीदा खातून (वय २३, रा. उत्तर प्रदेश) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती जिया उल हक यानेच तिची चार मित्रांच्या मदतीने हत्या केली. हत्या करून त्याने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि वाढवणा-चाकूर रोडवरील तिरु नदीत फेकला होता.
या चौघांनी केली हत्या
२४ ऑगस्ट रोजी महिलेच्या हत्येची घटना समोर आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५ पथके स्थापन केली होती. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले.
जिया उल हक (वय ३४), सज्जाद जरुल अन्सारी (वय १९), अरबाज जमलू अन्सारी (वय १९), साकीर इब्राहीम अन्सारी (वय २४) आणि आझम अली ऊर्फ गुड्डू (वय १९) असे आरोपींची नावे आहेत.
पत्नीची हत्या का केली?
फरीदा खातून हिचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध असल्याचा पती जिया उल हक याला संशय होता. त्या शंकेतून त्याने चौघांना सोबत घेतले आणि पत्नीची हत्या कली. त्यानंतर त्यांनी मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पुलावरूनच तिरू नदीतील झुडुपांमध्ये फेकला होता.
पोलिसांना फरीदा खातूनचा मृतदेह मिळाला, तेव्हा तिचा चेहरा विद्रूप झालेला होता. ओळख पटवणे अवघड होते. त्यामुळे आधी तिच्या चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले. त्यानंतर एआयची मदत घेण्यात आली आणि तिचा चेहरा तयार करण्यात आला. त्यानंतर शोध घेतला असता, हत्या करणाऱ्यापर्यंत पोलीस पोहचले.