तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे ५५ गावांत शुक्रवारी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ३२० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २२० मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ५५ गावांतील एकूण ९८ हजार ९१२ पैकी ७९ हजार ८५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८०.७४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील दिग्गज मंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे (कुमठा खु.), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील (हाळी), भाजपचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगीले (नळगीर), माजी समाजकल्याण सभापती मधुकर एकुर्केकर (एकुर्का रोड), बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार (किनी यल्लादेवी), महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई बापूराव राठोड, जि. प. सदस्य बसवराज पाटील, कौळखेडकर (कौळखेड), माजी पं. स. सभापती सत्यकला गंभिरे (करवंदी), पं. स. सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, जि. प. सदस्या आशाताई पाटील (दावणगाव), माजी पं. स. सभापती संगम आष्टुरे, माजी पं. स. सदस्य दत्तात्रय बामणे (वाढवणा बु.), पं. स. उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोंगरशेळकी), माजी पं. स. उपसभापती रामदास बेंबडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर (इस्मालपूर) आदींच्या गावात निवडणूक झाली आहे.