वर्दीतील आईकडून चापटासहित चालान; सुसाट ट्रिपल सीट विद्यार्थिनींवर महिला पोलिस भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:16 IST2025-06-24T14:13:41+5:302025-06-24T14:16:26+5:30
तीन मुली एका दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना चौकात तैनात असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना अडवले.

वर्दीतील आईकडून चापटासहित चालान; सुसाट ट्रिपल सीट विद्यार्थिनींवर महिला पोलिस भडकल्या
लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका चौकात ट्रिपल सीटने दुचाकीवरून भरधाव जात असलेल्या तिघी विद्यार्थिनींना रविवारी वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने थांबवून जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकारात काही नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे समर्थन केले असले, तरी "दंडात्मक कारवाई झाली असती, तर मारहाणीची गरज नव्हती" अशी टीकाही काही जणांनी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तीन मुली एका दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना चौकात तैनात असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना अडवले. "तुझ्या वडिलांना फोन कर, मगच गाडी घेऊन जा," असे म्हणत त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थिनीला मारहाण केली व अपमानास्पद भाषाही वापरली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. वाहतूक नियमांनुसार ट्रिपल सीटवरून जाणाऱ्यांवर दंड आकारणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी मारहाणीचा मार्ग स्वीकारल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित महिला पोलिसांचे म्हणणे आहे की, "दुचाकीचा वेग अधिक होता, त्यामुळे त्या थांबवल्या नसत्या, तर अपघात होण्याची शक्यता होती." दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
मलाही दोन मुली आहेत, महिला पोलिसांचा संताप
भरधाव वेगात जाणाऱ्या या मुलींना थांबवले असता त्या अधिक वेगाने निघून गेल्या. त्यांनी पाठलाग करून त्यांना रस्त्याच्या बाजूला गाडी घेण्यास सांगितल्याचे महिला पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलींना जाब विचारात मारहाण केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ''भरधाव वेगात मुली ट्रिपल सीट जात होत्या. त्यांना हात दाखवला तरी थांबल्या नाहीत. अपघात झाला असता तर महागात पडले असते. मलाही दोन मुली आहेत. विनाकारण तुम्हाला बोलत नाही मी. माझ्या दोन चापटा तुम्हाला पुढच्यावेळी गाडी चालवताना लक्षात राहतील. मला चारचौघात तुम्हाला बोलायला चांगले वाटत नाही पण मागे बसलेल्या दोन्ही मुली वाकड्या बसल्या होत्या, काय गरज होती असे बसायची. हिच्यामुळे गाडीचे बॅलन्स गेले. तुम्हाला बेफाम वेगात गाडी चालवायला माफ आहे का? जीव उदार झाला आहे का? काही झाले असते तर मायबाप रडत बसले असते आयुष्यभर'', अशा शब्दात या महिला वाहतूक पोलिसांनी संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.