US-Israel-Iran war: युद्धामुळे सुका मेव्याचा भाव भडकला, आयातीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:00 IST2026-03-04T18:58:46+5:302026-03-04T19:00:23+5:30
आणखी दरवाढीचा धोका

संग्रहित छाया
कोल्हापूर : पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम धर्मीयांकडून उपवास केले जातात. त्यामुळे खजूर, काजू, बदाम, बेदाणा, चारोळी, पिस्ता, अंजीर, अक्रोड, केशर, खोबरे आदी प्रकारच्या सुकामेव्याला मोठी मागणी असते. बहुतांश सुकामेवा अमेरिका आणि आखाती देशांमधून भारतात आयात होतो. यंदा रमजान महिन्यातच अमेरिका-इराणयुद्धाचा भडका उडाल्याने आयातीवर परिणाम होत आहे. यामुळे सुकामेव्याच्या किमती १५ ते २० टक्के वाढल्या आहेत. युद्ध लांबल्यास आणखी दरवाढ होण्याचा धोका आहे.
रमजानमध्ये बाजारपेठा बहरल्या
रमजान महिन्यात मुस्लीम धर्मीयांकडून केल्या जाणाऱ्या उपवासानंतर आहारात सुकामेव्याचा वापर केला जातो. या काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन विक्रेते १५ ते २० दिवस आधीच सुकामेव्याची मागणी करतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात सुकामेवा उपलब्ध असल्याने बाजारपेठा बहरल्या आहेत.
सुकामेव्याला मोठी मागणी
रमजानमध्ये विविध प्रकारची मिठाई तयार केली जाते. यात सुकामेवा वापरला जातो. तसेच दैनंदिन आहार आणि भेटवस्तू देतानाही सुकामेव्याचा वापर केला जातो. यामुळे याच्या मागणीत ३० ते ३५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यंदा दरांवर युद्धाचा परिणाम
अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेले युद्ध आखाती देशांमध्ये भडकले आहे. विमान आणि जहाजांचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. यामुळे आयातीवर मोठा परिणाम होत आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सुकामेव्याचे साठे संपत आले आहेत. त्यामुळे दरवाढ झाली आहे.
कुठून कोणता सुकामेवा येतो?
अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पिस्ते आणि बदामाची आवक होते. अफगाणिस्तानातून पिस्ता, जर्दाळू येतात. ऑस्ट्रेलियातून बदाम आणि पिस्ते येतात. चिली आणि अमेरिकेतून अक्रोडाची आवक होते. इराण, अफगाणिस्तानमधून अंजिराची आयात होते. सौदी अरेबिया, ट्युनिशिया आणि काही आखाती देशांमधून खजुराची आयात केली जाते.
बाजारात दर असे
सुकामेवा --- प्रतिकिलो दर
खजूर --- १२० ते ४०००
बदाम --- ८०० ते १०००
पिस्ता --- १९०० ते २५००
अक्रोड --- १२०० ते १६००
अंजिर --- १२०० ते १४००
बेदाणे --- ४५० ते ६००
जर्दाळू --- ५०० ते ६००
रमजानमुळे सुकामेव्याच्या मागणीत वाढ असल्याने दरात काहीशी वाढ झाली आहे. युद्ध जास्त दिवस चालल्यास येणारा माल वाटेत अडकून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे दर आणखी वाढू शकतात. - सागर सदलगे, सुकामेवा विक्रेते