यूपीएससी निकाल: कोल्हापूरात पाचजण बनले आयएएस, जयसिंगपूरचा ऋषिकेश देशात ६१ वा
By संदीप आडनाईक | Updated: March 6, 2026 23:26 IST2026-03-06T23:26:10+5:302026-03-06T23:26:10+5:30
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे चौघांचे यश

यूपीएससी निकाल: कोल्हापूरात पाचजण बनले आयएएस, जयसिंगपूरचा ऋषिकेश देशात ६१ वा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या रोहित मालवेकर, सिद्धार्थ तगड, प्रथमेश शिंदे, मनोज पाटील या चार विद्यार्थ्यांसह जयसिंगपूरच्या ऋषिकेश राजेंद्र आलासे हे पाचजण आयएएस झाले आहेत. विशेष म्हणजे ऋषिकेशचा पहिल्या १०० क्रमांकांत समावेश आहे. त्यांच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देशातील या सर्वात कठीण परीक्षेचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात. यंदाची पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी झाली. मुख्य परीक्षा २२ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली. एकूण २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. देशभरातून ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुलाखत प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडली.
कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे रोहित मालवेकर (६०१), सिद्धार्थ तगड (६१९) प्रथमेश शिंदे (८१७) आणि मनोज पाटील (४९३) हे चौघेही आयएएस बनले आहेत. मूळच्या अहिल्यानगरच्या २५ वर्षीय सिध्दार्थने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. त्याचे वडील कृषिक्षेत्रात कार्यरत आहेत. मनोज पाटील हे २०१८ च्या बॅचचे विद्यार्थी आहेत.
ऋषिकेशचे कठोर परिश्रम
कठोर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर जयसिंगपूरच्या ऋषिकेश आलासे (वय २७) याने युपीएससी परीक्षेत देशभरात ६१ वा क्रमांक पटकावून आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले. ऋषिकेशचे प्राथमिक शिक्षण सांगलीत, तर त्यानंतरचे शिक्षण मुंबईत झाले. एनटीएससीमध्ये तो देशात सतरावा आला होता. स्वयं अध्ययनातून या परीक्षेचे त्याने तयारी केली. दोन वेळा त्याचे यश हुकले होते. शुक्रवारी मात्र त्याने देशभरात ६१ वे स्थान पटकावले. त्याचे वडील राजेंद्र आणि आई विद्या हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात आहेत.
ध्येयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करताना स्वतःवर आत्मविश्वास असणे देखील गरजेचे आहे, त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो -ऋषिकेश आलासे, जयसिंगपूर