Kolhapur: अंबाबाई मंदिर आवारातील भूमिगत पार्किंग रद्द, दर्शन मंडप पूर्व दरवाज्यासमोर; आराखड्यात संभाव्य सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:23 IST2026-01-21T18:23:33+5:302026-01-21T18:23:51+5:30
सुरक्षितता, गर्दीचा विचार करून निर्णय

संग्रहित छाया
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत नियोजित भूमिगत पार्किंग रद्द करण्यात येणार आहे. मंदिराची सुरक्षितता, दक्षिण दरवाजा ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरातील जागेची उपलब्धता आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. तसेच, दर्शन मंडप पूर्व दरवाज्याबाहेरील सरलष्कर भवन येथे होणार असून, त्यादृष्टीने अंबाबाई मंदिर आराखड्यात सुधारणा करण्यात येणार आहे.
श्री अंबाबाई मंदिराच्या १४०० कोटींच्या आराखड्यात सुधारणा केल्या जात असून, त्याअंतर्गत भूमिगत पार्किंगची व्यवस्था रद्द करण्याचा विचार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू आहे. आराखडा पहिल्यांदा जनतेसमोर मांडला गेला. त्याचवेळी भागातील व्यावसायिक व जाणकारांनी भूमिगत पार्किंगला विरोध केला होता, मात्र त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले गेले होते. परिसरातील वाहतूक, भाविकांची गर्दी, बाजारपेठ, सुरक्षितता यादृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे.
पूर्व दरवाज्याबाहेर दर्शन मंडप
अंबाबाई गाभारा दर्शनाची रांग पूर्व दरवाज्यातून जात असून, हाच परिसर जास्त जवळचा आहे. सरलष्कर भवनची इमारत अशीही आराखड्यात समाविष्ट आहे. येथेच दर्शन मंडप केले जाणार आहे. दर दक्षिण दरवाजा येथे बैठकीचा हॉल, अभिषेकाचे भाविक, पूजा साहित्यांसह विविध दुकाने आणि भाविकांना सोयीसुविधा दिल्या जातील.
भूमिगत पार्किंग अडचणीच जास्त
चिंचोळी जागा, वाहतूक कोंडी : बिन खांबी गणेश मंदिर येथे चिंचोळी जागा त्यात भूमिगत पार्किंग म्हणजे किमान १००-२०० च्यावर चारचाकी व दुचाकी वाहने येणार, म्हणजे हलायचीसुद्धा सोय राहणार नाही. लांब पार्किंग असणाऱ्यांसाठी बसची शटल सेवा दिली जाणार होती. बस आले, तर अजूनच अवघड परिस्थिती.
सुरक्षिततेची भीती : दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिरांची सुरक्षितता वाढवली जात असताना, मंदिराला लागून भूमिगत पार्किंग व्यवस्था म्हणजे सुरक्षेला सुरुंगच लागला असता. शेकडो दुचाकी-चारचाकी वाहनांची तपासणी कोण करणार, काही अनुचित घटना घडलीच, तर जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न निर्माण होणार.
बाजारपेठेवर ताण : हा शहराचा हा अगदीच मध्यवर्ती परिसर असून, महाद्वार रोडची मुख्य बाजारपेठ आहे. वाहनांमुळे बाजारपेठेवर मोठा ताण येणार आहे. वाहने येणार कुठून, जाणार कुठून वळणार कसे, हे अडचणीचे ठरले असते.