Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या दोन संचालकांत हमरीतुमरी; कर्मचाऱ्याच्या बदलीचे कारण असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:12 IST2026-02-17T12:11:39+5:302026-02-17T12:12:11+5:30
कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने मोठा गोंधळ, अध्यक्षांकडून हाणामारीचा इन्कार

Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या दोन संचालकांत हमरीतुमरी; कर्मचाऱ्याच्या बदलीचे कारण असल्याची चर्चा
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या दोन संचालकांत हमरीतुमरी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, असा कोणतीही प्रकार झालेला नाही. संचालकांत असणारा किरकोळ वाद आम्ही सामोपचाराने मिटविला असल्याचे स्पष्टीकरण कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी दिले. दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कारखान्यावर आल्याने गाेंधळ झाल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सोमवारी सभा होती. या बैठकीत कारखान्याचे कर्मचारी संजय नाधवडे हे बदलीच्या ठिकाणी हजर होत नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संचालक सुनील खराडे यांनी केली. मात्र, या मागणीला संचालक धीरज डोंगळे यांनी तीव्र विरोध करत बदली करायची नाही, असे म्हटल्यानंतर सुनील खराडे आणि धीरज डोंगळे यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती. या वादानंतर एकमेकांना एकेरी भाषा वापरत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. धीरज डोंगळे यांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती कळताच त्यांनी कारखान्यावर धाव घेतली.
यावेळी कारखान्याचा मीटिंग हॉल आणि मुख्य इमारतीत एकच गदारोळ उडाला. कोण कोणाच्या अंगावर जातोय, कोण वाद सोडवतोय याचा अंदाज येत नव्हता. दरम्यान, या गदारोळात खिडकीच्या काचा फुटल्याने काही जणांच्या अंगात घुसल्याने रक्तबंबाळ झाल्याचे व्हिडीओवरून समोर येत होते.
अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांच्यासह संचालक मंडळाने धीरज डोंगळे आणि सुनील खराडे यांना एकमेकांपासून बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ चित्रण आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी धाव घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांतील वाद तब्बल दोन तास सुरूच होता.
हाणामारीचे चित्रण जसे सोशल मीडियावर व्हायरल झाले, तसे राहुल पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी दोघांनाही सक्त सूचना करत वाद थांबविण्यास आणि कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त करू नये, अशा सूचना केल्या.
किरकोळ वाद : पाटील
संचालक मंडळात कोणत्याही प्रकारची हाणामारी झालेली नाही. किरकोळ वाद होता, तो आम्ही सामोपचाराने सोडविलेला आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
तीव्र प्रतिक्रिया....
सहकारात स्थापन झालेला भोगावती हा दुसरा असलेल्या कारखान्यावर दादासाहेब पाटील-कौलवकर, गोविंदराव कलिकते, गोपाळराव हुजरे, आनंदराव पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, आमदार पी. एन. पाटील या दिग्गज मंडळींनी काम करत कारखान्याला दिल्लीपर्यंतची पारितोषिके मिळवून दिली. मात्र, अशा प्रकारची कोणतीही घटना कधी घडली नव्हती, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.