सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून पोलिस निरीक्षकाची आत्महत्या, माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:59 IST2025-06-07T17:58:43+5:302025-06-07T17:59:22+5:30
मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी, कारागृह विभागात ५०० कोटींचा अपहार

सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून पोलिस निरीक्षकाची आत्महत्या, माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप
कोल्हापूर : वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या त्रासाला कंटाळून पोलिस तत्कालीन निरीक्षक अशोक गोरक्षनाथ सदरे यांनी १२ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात आत्महत्या केली होती, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या प्रकरणी सुपेकर यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी (दि. ५) पत्राद्वारे केली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा आरोप वरिष्ठ पोलिस अधिकारी सुपेकर यांच्यावर झाला आहे. यात माजी खासदार शेट्टी यांनी आणखी काही आरोपांची भर घातली आहे. सुपेकर हे जळगाव येथे पोलिस अधीक्षक असताना त्यांच्या त्रासाला कंटाळून पोलिस निरीक्षक अशोक सदरे यांनी आत्महत्या केली होती. सदरे यांच्या सुसाईड नोटमध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख होता. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुपेकरांची चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
कारागृह विभागात ५०० कोटींचा अपहार
वरिष्ठ पोलिस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी संगनमताने कारागृह विभागात ५०० कोटींचा अपहार केल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी दिवाळीत कैद्यांसाठी १२०० रुपये किलो दराने काजूकतली खरेदी केल्याची बिले दाखवली. प्रत्यक्षात अशी खरेदी झालीच नसल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे.