कोल्हापुरात सायबर चौकात पुन्हा थरार; उसाच्या ट्रकचे नियंत्रण सुटले, टेम्पोसह उडवल्या चार कार, चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:07 IST2025-12-10T12:06:56+5:302025-12-10T12:07:48+5:30
ऐन गर्दीवेळी शेकडो लोकांच्या काळजाचा चुकला ठोका, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

कोल्हापुरात सायबर चौकात पुन्हा थरार; उसाच्या ट्रकचे नियंत्रण सुटले, टेम्पोसह उडवल्या चार कार, चौघे जखमी
उद्धव गोडसे
कोल्हापूर : केएसबीपी चौकातून सायबर चौकाकडे येणाऱ्या भरधाव ऊस वाहतूक ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावरील दुभाजकाला धडकला. त्यानंतर ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या चार कारसह एका टेम्पोला धडक देऊन ट्रक एका बसवर कलंडला. या विचित्र आणि थरारक अपघातात ट्रक चालकासह कार आणि टेम्पोतील चौघे किरकोळ जखमी झाले. ऐन गर्दीच्या वेळेत मंगळवारी (दि. ९) सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी झालेल्या अपघाताने चौकातील शेकडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकवला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक प्रदीप महादेव सुतार (वय ३७, रा. पट्टणकुडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) हे उसाने भरलेला ट्रक घेऊन सायबर चौकातून पुढे आसळज (ता. गगनबावडा) येथील डीवाय पाटील साखर कारखान्याकडे निघाले होते. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी केएसबीपी चौकातून सायबर चौकात येताना त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. समोरच्या वाहनांवर ट्रक जाऊ नये यासाठी त्यांनी रस्त्याच्या दुभाजकावर ट्रक घालून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरच्या तीन कारला धडक देऊन ट्रक डाव्या बाजूला थांबलेल्या युका डायग्नोस्टिक कंपनीच्या बसवर कलंडला.
या अपघातात कलंडलेल्या ट्रकखाली कार सापडून तिचा चक्काचूर झाला. सुदैवाने कारमधील सुनील रेडेकर (५३, रा. पार्वती पार्क, कळंबा रोड, कोल्हापूर) बचावले. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांना तातडीने कारच्या काचा फोडून सुखरूप बाहेर काढले. ट्रकच्या धडकेत सिग्नलला थांबलेल्या छोटा हत्ती टेम्पोचा चालक अभिषेक माळी, कारमधील प्रदीप पटेल हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह राजारामपुरी पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमींना बाहेर काढले. ट्रकचालकावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, आदींनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली.
चौघे बचावले
या अपघातात ट्रकचालक प्रदीप सुतार यांच्यासह वेरना कारमधील सुनील रेडेकर, इनोव्हा कारमधील प्रदीप रणछोडदास पटेल (६०, रा. टाकाळा, कोल्हापूर), टेम्पोतील अभिषेक शिवाजी माळी (२५, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) आणि बसचालक नामदेव कांबळे (४२, रा. हसूर दुमाला, ता. करवीर) हे चौघे सुदैवाने बचावले.
सव्वा तासाने क्रेन पोहोचली
अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी पोलिसांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधून क्रेन मागवली होती. अपघातानंतर सव्वा तासाने क्रेन सायबर चौकात पोहोचली. दोन क्रेनच्या मदतीने पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी अपघातग्रस्त वाहने हटवली. यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एक रुग्णवाहिका सज्ज होती.
३ जून २०२४ ची आठवण
या चौकात ३ जून २०२४ ला निवृत्त प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण यांचाही कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या थरारक अपघातात दोन सख्ख्या भावासह डॉ. चव्हाण यांचाही मृत्यू झाला होता. त्या अपघाताची आठवण मंगळवारी झाली. सोशल मीडियावर कोल्हापुरातील सायबर चौक आणि पुण्यातील नवले ब्रीज यांचे काय खरं नाही बाबा अशा प्रतिक्रिया उमटल्या.