Pune Bridge Collapse: सुट्टी मिळाली की कोल्हापूरला येतो; लेकाचा तो कॉल शेवटचा ठरला, बापाने हंबरडा फोडला
By सचिन यादव | Updated: June 17, 2025 13:02 IST2025-06-17T13:02:19+5:302025-06-17T13:02:48+5:30
उजळाईवाडीतील माने गदगदले : पुण्यातच झाले मुलगा, नातवावर अंत्यसंस्कार

Pune Bridge Collapse: सुट्टी मिळाली की कोल्हापूरला येतो; लेकाचा तो कॉल शेवटचा ठरला, बापाने हंबरडा फोडला
सचिन यादव
कोल्हापूर : `पप्पा, फादर्स डेच्या तुम्हाला खूप शुभेच्छा, आईची आणि तुमची काळजी घ्या, आम्ही सुट्टी मिळाली की कोल्हापूरला येतो`, अशी विचारपूस मुलाने केली परंतु लेकाचा हा कॉल शेवटचा ठरला, असे सांगत वडील सुधीर माने यांनी हंबरडा फोडला. या घटनेनंतर माने कुटुंबीय पुण्यातच आहेत. तिथेच मुलगा व नातवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडिलांची आणि मुलाची शेवटची फोनवर झालेली बातचीत, ती नक्कीच खूप दुःखद आणि भावनिक ठरली. पुणे येथील इंद्रायणी नदीवरील साकव कोसळून झालेल्या अपघातात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रोहित माने आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा विहान यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे अख्ख्या कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला.
रोहित हा कामानिमित्त चिंचवड येथील आयटी कंपनीत नोकरीला होता. तो नावाजलेला क्रिकेटपटू होता. कामानिमित्त पुणे येथे वास्तव्य असले तरी त्यांची नाळ कुटुंबाची आणि कोल्हापूरशी जुळलेली होती. वडील सुधीर माने यांची पंधरा दिवसांपूर्वी मुलगा, नातू आणि सुनेशी भेट झाली होती.
फादर्स डेच्या निमित्ताने रोहितने वडिलांना फोन केला. दोघांत दोन मिनिटे बोलणे झाले. ‘पप्पा, आम्ही जे काही आहोत, ते तुमच्यामुळेच आहोत. तुम्हाला दीर्घायू लाभो.’ ‘नातू विहानची काळजी घे, त्याला भेटूनही पंधरा दिवस झाले, पुढील सुट्टीच्या वेळी सगळेजण या’, असा संवादही दोघांत झाला. नातू विहानही आजोबांशी काही वेळ बोलला, मात्र हा त्यांच्यातील शेवटचा संवाद ठरला.
विकेंड असल्याने रोहित, पत्नी शमिका आणि मुलगा विहान पर्यटनाला जाण्यासाठी ठरले. मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर जाण्याचे निश्चित केले. मात्र आयुष्याची दोरी तुटणार असल्याची कल्पना नव्हती. अपघातात पितापुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. रोहित यांच्या आई नर्मदा या अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत.
आत्ता सुट्टीत कोण येणार..
महिन्यातून एकदा तरी मुलगा वडील आणि आईला भेटण्यासाठी कोल्हापूरला येत होता. नातू आला की आजी आणि आजोबांना आनंदाला पारावार राहायचा नाही. चारचाकी गाडीतून उतरला की नातवाला पहिल्यांदा कवेत घ्यायचे, मात्र आता सुट्टीत मुलगा आणि नातूही आयुष्यभर दिसणार नाही, असे सांगत आई आणि बापाचं काळीज गहिवरलं.