Kolhapur News: कडवी नदीत फूड मॉल, ट्रक टर्मिनलसाठी टाकला भराव; रत्नागिरी-नागपूर महामार्गलगतचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:46 IST2026-04-01T17:45:49+5:302026-04-01T17:46:26+5:30
पुराच्या पाण्याला अडथळा ठरणार असल्याचा स्वाभिमानीचा आरोप

Kolhapur News: कडवी नदीत फूड मॉल, ट्रक टर्मिनलसाठी टाकला भराव; रत्नागिरी-नागपूर महामार्गलगतचा प्रकार
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रत्नागिरी-नागपूर महामार्गजवळील शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथे फुड मॅाल आणि ट्रक टर्मिनलसाठी कडवी नदीच्या पात्रात भरावा टाकला जात आहे. यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार आहे. परिणामी तुंबणाऱ्या पाण्यामुळे शेतीची नुकसान होणार आहे, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंगळवारी केली. भराव टाकण्यात येणाऱ्या परिसराची त्यांनी पाहणी करून परिणामाबद्दल मोबाइलवरून अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्याची महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
महामार्गाला लागूनच कडवी नदी वाहते. सन २०१९ च्या महापुरात या मार्गावर जवळपास ८ ते १० फूट पाणी आले होते. कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग पाच दिवस वाहतुकीस बंद होता. वारूळ येथे कडवी नदीच्या पात्रातच फुडमॉल आणि ट्रक टर्मिनलसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जवळपास २० फुट भराव टाकला आहे. वारूळ पासून ते आंब्यापर्यंत तीन ते चार किलोमीटर लांबीमध्ये पाचशे ते सहाशे एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे.
वारूळ, चांदोली, घोळसवडे, केर्ले, जावली, धावडवाडा, हुंबोली या गावांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. रस्त्याच्या दक्षिण बाजूस डोंगर असल्याने उदगीरीकडून येणारे पाणी, आंबा परिसर आणि मानोली धरणातून येणारे पाण्यामुळे जमीन खचण्याचा धोका आहे. भराव्यामुळे महामार्गावर तीन ते चार फूट पाणी येण्याचा धोका आहे. पावसाळ्यात येणा-या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने नदी पात्र बदलण्याची शक्यता आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांचे शेट्टी यांनी लक्ष वेधले.