भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून मर्यादित उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येत आहेत. तरीही उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाच्या पातळीवर फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचा अनुभव कायमचाच आहे. उत्पन्न वाढीचा जेव्हा विषय येतो तेव्हा घरफाळा, पाणीपट्टी वाढीचा विषय समोर येतो, पण याशिवाय उत्पन्नाचे अन्य स्त्रोत कसे निर्माण होतील याचाही विचार केल्यास किमान शंभर कोटींनी उत्पन्न वाढू शकते, असा अभ्यासकांचा दावा आहे.आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सन २०२५-२०२६ सालाचे अंदाजपत्रक मागच्या वर्षी मांडले. त्यामध्ये ६३५ कोटींची अपेक्षित जमा धरण्यात आली होती. त्यापैकी ४३० कोटी ८४ लाखांचा महसूल मिळाला. वसुलीचे प्रमाण ६७ टक्के आहे. मार्चअखेर ही वसुली ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत जाईल. अंदाजपत्रकाची ही पारंपरिक पद्धत झाली, पण उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधले गेले नाहीत. त्यामुळे जमा होणाऱ्या उत्पन्नातील बहुतांशी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च होते. स्वनिधीतून शहरातील विकासासाठी फारच मर्यादित निधी उपलब्ध होतो. त्यामुळे शासकीय अनुदानावर विसंबून राहावे लागण्याची वेळ प्रशासनावर येते.काय आहेत उत्पन्न वाढविण्याचे पर्यायघरफाळा वसुलीसाठी प्रयत्न कोल्हापूर शहरात जवळपास दीड लाखावर मिळकती आहेत. या मिळकतीमधील अंदाजे वीस ते पंचवीस टक्के मिळकतींना अद्याप घरफाळाच लागू झालेला नाही. अशा अनेक इमारती आहेत की त्यामध्ये वाढीव बांधकाम होऊनही त्यांची नोंद घरफाळा विभागाकडे नाही. जर नवीन इमारतींसह वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना घरफाळा सुरु केला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते.मार्केट विकसनाकडे दुर्लक्ष शहरात सध्या अस्तित्वात असलेली भाजी मार्केट तसेच नव्याने व्यापारी संकुल उभारण्याचे प्रयत्न केले गेले तर त्यापासून उत्पन्न वाढू शकते. बीओटीवर व्यापारी संकुल उभारणे हा मुद्दा काही जणांच्या फायद्याचा असला तरी तो दीर्घकाळाचा विचार करता महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने नुकसानीचा आहे. त्यामुळे अशी व्यापारी संकुले स्वत: महापालिकेने उभारली आणि भाड्याने दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. जुन्या भाजी मंडईदेखील विकसित केल्यास आणि त्याची क्षमता वाढविली तर उत्पन्न वाढणार आहे.दुकान गाळ्यांचे भाडे थकले महापालिकेचे सुमारे दोन हजार दुकान गाळे आहेत. या दुकान गाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. २०१५ ते २०१९ सालातील मोठी थकबाकी राहिली आहे. याबाबत निर्णय घेऊन नवीन करार केले तर महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि गाळेधारकांना एक हमी मिळेल.विनाशुल्क फेरीवाल्यांचा व्यवसायकोल्हापूर शहरात जवळपास सात हजारांच्या पुढे फेरीवाले, केबिनधारक, विक्रेते रस्त्याच्या कडेला व्यवसाय करुन स्वत:ची रोजीरोटी भागवितात. पण महापालिकेला त्यांच्यापासून काहीच मिळत नाही. फेरीवाल्यांच्या मागण्याप्रमाणे त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करुन त्यांच्यावर विशिष्ट शुल्क लावले तर रोजचे उत्पन्न वाढणार आहे.विनापरवाना यात्रीनिवास सुरुअंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनाला रोज असंख्य भाविक येत असतात. कधी कधी त्यांच्या राहण्याची सोय येथे होत नाही इतके भाविक येतात. कोल्हापूर शहरात जवळपास ५०० यात्री निवास आहेत. काही मोजके यात्रीनिवास चालक सोडले तर बहुतांशी यात्रीनिवास विनापरवाना आहेत. त्यांना परवाने घेण्यास भाग पाडून नियमित करुन दिल्यास चांगले उत्पन्न वाढू शकते.पार्किंग सुविधा वाढविल्या पाहिजेतशहरात पार्किंगचा विषय अतिशय गंभीर झाला आहे. त्यामुळे पार्किंगची ठिकाणे निश्चित करुन ती ‘पे अँड पार्क’ करिता उपलब्ध करुन दिल्यास उत्पन्न तर वाढेलच शिवाय नागरिकांना सुविधाही मिळेल. ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु करता आलेले नाही.
Web Summary : Kolhapur Municipal Corporation struggles with revenue. Experts suggest increasing property tax coverage, developing markets, resolving shop rent arrears, regulating street vendors, licensing guesthouses, and improving parking facilities to boost income.
Web Summary : कोल्हापूर महानगरपालिका राजस्व के लिए संघर्ष कर रही है। विशेषज्ञों का सुझाव है कि संपत्ति कर कवरेज बढ़ाना, बाजारों का विकास करना, दुकान किराए के बकाया का समाधान करना, सड़क विक्रेताओं को विनियमित करना, गेस्टहाउसों को लाइसेंस देना और आय को बढ़ावा देने के लिए पार्किंग सुविधाओं में सुधार करना शामिल है।