थंडीचा कडाका सोमवारपर्यंत आणखी वाढणार, तापमान कसं असणार..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:44 IST2026-01-24T16:43:44+5:302026-01-24T16:44:10+5:30
कोकणासह मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस दमट वातावरण

थंडीचा कडाका सोमवारपर्यंत आणखी वाढणार, तापमान कसं असणार..जाणून घ्या
कोल्हापूर : वातावरणात सुधारणा झाल्याने पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी उणे २.८ अंशांवर पारा होता. दिवसभरात कमाल तापमान २९ अंशांपर्यंत, तर किमान तापमान १४ अंशांदरम्यान होते. सोमवारी (दि. २६) पुन्हा काही अंशी थंडी वाढण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी, दि. २० ते गुरुवार, दि. २२ पर्यंतच्या तीन दिवसांत थंडी कमी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी काही अंशी ढगाळ वातावरण जाणवत होते. मात्र, आता पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर घड्याळ काटा दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती वर्तुळाकार चक्रीय वारा स्थिती आहे. त्याच्या शेवटच्या परिघात, बंगालच्या उपसागरातून ताशी २५-२७ किलोमीटर येणाऱ्या वेगवान आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे थंडीचा चढ-उतार जाणवत आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस दमट वातावरण निर्माण झाले होते. या आठवड्यात शहर आणि ग्रामीण भागात सकाळी धुक्याची शक्यता असून, दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंशांपर्यंत, तर किमान तापमान १५ ते १६ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात पहाटे गारवा जाणवेल. दुपारी सूर्यप्रकाशामुळे तापमानात थोडी वाढ होऊन थंडी आणि उबदारपणाचा मिलाफ जाणवणार आहे.
असे असेल तापमान
वार - कमाल - किमान
शनिवार - २९ - १४
रविवार - २९ - १४
सोमवार - २९ - १५
मंगळवार - ३० - १६
बुधवार - ३० - १७
गुरुवार - ३० - १६