जनगणनेला सुरुवात होणार; पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण, कोल्हापूर जिल्ह्यात कधीपासून...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:20 IST2026-02-06T18:13:04+5:302026-02-06T18:20:29+5:30
Census 2027: काम वेळेत, अचूक करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

संग्रहित छाया
कोल्हापूर : जलद आणि अचूक जनगणनेसाठी ग्रामीण भागातील महसुली हद्द विचारात घेऊन ७०० ते ८०० लोक किंवा १८० ते २०० घरांचा एक गट तयार करावा. शहरी भागात प्रगणकांनी विभागानुसार (वॉर्डनुसार) लोकसंख्या मोजावी. १० फेब्रुवारीपासून प्रगणक गट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करा. काम दिलेल्या वेळेत व अचूकपणे पूर्ण करा, जनगणनेची माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी दिला.
केंद्र शासनाच्या फेब्रुवारी २०२७ पासून जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित संबंधित अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, जनगणना सहायक संचालक अजय ठाकूर, जिल्हा समन्वयक मयूर पवार, उपसंचालक (सांख्यिकी) सीमा अर्दाळकर, करमणूक कर अधिकारी तेजस्विनी पाटील, करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जनगणना कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये असून पहिल्या टप्प्यात घरांची यादी करणे आणि घरगणना करणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२७ पासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील व्यक्तीनिहाय गणना केली जाईल. जनगणनेसाठी माहिती संकलित करताना कोणताही भाग सुटू नये अथवा त्या भागाची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, निवडणूक कार्यक्रमानंतर प्रशिक्षणांसह प्रत्यक्ष कामाला अधिक गती देण्यात येईल.