Kolhapur-Cyber Chowk Accident: ट्रकखाली चिरडलेल्या कारला बसचा टेकू अन् रोखला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:13 IST2025-12-10T19:11:49+5:302025-12-10T19:13:15+5:30
आता आपण संपलोच असे एका क्षणी वाटून गेले.

Kolhapur-Cyber Chowk Accident: ट्रकखाली चिरडलेल्या कारला बसचा टेकू अन् रोखला मृत्यू
पोपट पवार
कोल्हापूर : सिग्नलवर थांबलेल्या कारला मागून आलेल्या ट्रकने जोराची धडक देत ट्रक डिव्हायडरवरून थेट कारवर कोसळला. कारचा भाग पूर्णपणे चेपत एका बसवर टेकू बनून राहिला. या दोन्ही वाहनांमध्ये चेंदामेंदा झालेल्या कारमधील व्यक्ती जिवंत राहिली असेल असे कुणीच म्हणत नव्हते. पण, बसचा टेकू मिळाल्यामुळे कारमधील व्यक्ती अगदी सहीसलामत असल्याचे पाहून 'मृत्यू जवळ आला पण बसने तो थांबवला' याचा याचि देही, याचि डोळा प्रत्यय मंगळवारी सायंकाळी सायबर चौकात आला. सुनील रेडेकर असे त्या नशीबवान व्यक्तीचे नाव.
सायंकाळी सातची वेळ. पार्वती पार्क, कळंबा रोडला राहणारे रेडेकेर हे त्यांच्या गोकुळ शिरगाव शॉपमधील काम आटोपून उद्यमनगरातील त्यांच्या दुसऱ्या शॉपमध्ये निघाले होते. त्यांची ही रोजचीच वेळ. सायबर चौकात सिग्नल सुरू असल्याने त्यांची कार काही मीटर अलीकडेच थांबली होती. इतक्यात मागून उसाने भरलेला ट्रक भरधाव वेगात डिव्हायडरला धडकून थेट शेजारील कारवर उलटला. यात रेडेकर यांची कार पूर्णपणे चेपली. मात्र, तिचा काही भाग शेजारील युका डायग्नोस्टिक कंपनीच्या बसवर गेल्याने कारला बसचा आधार मिळाला.
हा अपघात इतका भयावह होता की रेडेकर यांना आता आपण संपलोच असे एका क्षणी वाटून गेले. त्यांनी कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याच दिशेने त्यांना बाहेर पडता येईना. अपघातात कारच्या एका बाजूची काच फुटल्याने त्यातून त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इतक्यात पाठीमागे दुचाकीवर असलेले सद्दाम देसाई व आशिष कदम हे दोन युवक त्यांच्यासाठी देवदूतासारखे मदतीला धावून आले. त्यांनी रेडेकर यांना मदत करत कारमधून सुखरूपपणे बाहेर काढले.
मी जिवंत आहे....रेडेकरांना खरे वाटेना
अपघातातील कार दोन्ही वाहनांच्यामध्ये घुसल्याने तिचा पुरता चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे या अपघातातून आपण जिवंत बाहेर आलोय याचेच रेडेकर यांना आश्चर्य वाटत होते.
वेदनेपेक्षा मी जिवंत राहिलो याचेच समाधान
या अपघातात टेम्पोचालक अभिषेक माळी हाही किरकोळ जखमी झाला. गडमुडशिंगीचा रहिवासी असलेल्या अभिषेकचा किराणा माल दुकानदारांना पोहोचवण्याचा व्यवसाय आहे. कागलहून तो माल घेऊन राजारामपुरीत जात असताना सिग्नलवरच त्याच्या टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली. परिणामी, पुढच्या वाहनाला धडकून टेम्पोचा पुढचा भाग आतमध्ये गेला. यात प्रसंगावधान पाहून तो केबिनमधून तत्काळ बाहेर पडला. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. हातापायाला लागल्याच्या वेदनेपेक्षा जिवंत राहिलो याचेच समाधान तो मानत हाेता.
बघ्यांची प्रचंड गर्दी
अपघाताची माहिती सोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही वेळात बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली. गर्दी हटवण्यासाठी पोलिस वारंवार सूचना देत होते. अखेर बळाचा वापर करून गर्दी पांगवावी लागली. गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे झाले.
रस्त्यावर डिझेल
अपघात होताच एक कार आणि टेम्पोची इंधन टाकी फुटली. रस्त्यावरून डिझेलचा लोट वाहत होता. आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी डिझेलवर माती टाकली. या परिसरातील गर्दी हटवून बॅरिकेडस् केले. वाहतूक वळवून अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली.
सतराजणांचे दैवच बलवत्तर...
गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील कामे आटोपून अनेक व्यावसायिक, उद्योजक घरी जाण्याच्या घाईत होते. टेम्पोचालक अभिषेक माळी हा आट्याची पोती घेऊन राजारामपुरीत निघाला होता. युका डायग्नोस्टिक कंपनीची बस १७ कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात सोडण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी पाठीमागून आलेला ट्रक त्यांच्यासाठी काळ बनला होता. मात्र, वेळ चांगली म्हणून सर्वजण बचावले.
चालकाला गतीचा अंदाज आला नाही
ट्रक चालक प्रदीप सुतार हा दत्तवाड (ता. शिरोळ) येथून ऊस भरून निघाला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास ते हुपरी येथे चहासाठी थोडा वेळ थांबले होते. त्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावरून शिवाजी विद्यापीठ मार्गे ते केएसबीपी चौकातून सायबर चौकमार्गे पुढे गगनबावड्याकडे निघाले होते. उतारावर ट्रकच्या गतीचा अंदाज आला नाही. यातच गिअर बदलताना गोंधळून नियंत्रण सुटल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्कालीन यंत्रणा कुठे होती?
अपघात किंवा अन्य आपत्तीत तातडीने मदत पोहोचवता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आपत्कालीन विभाग आहे. मात्र, शहरातील मोठ्या अपघातांनंतर आपत्कालीन यंत्रणा अपवादानेच घटनास्थळी दिसते. सायबर चौकातील अपघातानंतरही आपत्कालीन यंत्रणा दिसली नाही, अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.