Kolhapur: 'स्वाभिमानी'ची २४ वी ऊस परिषद कधी होणार?, राजू शेट्टींनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:37 IST2025-09-25T18:37:11+5:302025-09-25T18:37:34+5:30
जयसिंगपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केली तारीख

Kolhapur: 'स्वाभिमानी'ची २४ वी ऊस परिषद कधी होणार?, राजू शेट्टींनी दिली माहिती
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर गुरूवार दि. १६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षापासून ऊसदराच्या एफ.आर.पी मध्ये वाढ झाली. मात्र शेतक-यांना वाढीव एफ.आर.पी चा फायदा झाला नाही. खते, बि -बियाणे, किटकनाशके, मजूरी, मशागत व तोडणी-वाहतूक यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. देशातील व राज्यातील साखर कारखानदार एकत्रित येवून एफआरपीमध्ये मोडतोड करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
सध्या राज्याच्या उच्च न्यायालयात एक रक्कमी एफआरपीची लढाई जिंकली आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार व राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या आव्हान याचिकेस स्थगिती दिली नसली तरीही ऊस उत्पादक शेतक-यांना कायदेशीर अडकविण्याचा कट रचला जात आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना यापुढे संघटित होवून लढाई लढण्याची गरज आहे.
नैसर्गिक आपत्ती, महापूर, अतिवृष्टी यासारख्या अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकरी रसातळाला गेला आहे. २४ व्या ऊस परिषदेनिम्मित्त सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटक याठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्यान्नावर, आण्णासो चौगुले, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, जयकुमार कोले, महेश खराडे, यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.