आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:58 IST2025-06-18T11:57:50+5:302025-06-18T11:58:29+5:30

सहा गावांसह बालिंगा, पाडळीच्या विस्तारित भागाचा समावेश होणार

Start the process of extending Kolhapur's boundaries with eight villages, Chief Minister Devendra Fadnavis suggests | आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना सोबत घेऊन नवीन प्रस्ताव तयार करण्यासह हद्दवाढीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निर्णय घेण्यास काही अडचणी येऊ शकतील का, याबाबत निवडणूक आयोगाशीही चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे गेली ५३ वर्षे रखडलेली हद्दवाढ होण्याची शक्यता ठळक झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा सूचना देऊन हद्दवाढीचा चेंडू पुन्हा एकदा महापालिकेच्या जाळ्यात टाकला आहे. त्यांच्या सूचनेमुळे हद्दवाढीचा आणखी एक नवीन प्रस्ताव राज्य सरकारकडे द्यावा लागणार आहे. हद्दवाढ तातडीने होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार याची उत्सुकता वाढली आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, सत्यजित कदम यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भेटले. हद्दवाढीला पहिल्यापासून विरोध करणारे आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. त्यांनीच शिष्टमंडळासोबत जाण्याचे टाळले.

विकासाच्या दृष्टीने शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणूनच शहराची गरज ओळखून हद्दवाढ करावी, असे आवाहन शिष्टमंडळाकडून करण्यात आले. अठरा गावे घेण्याऐवजी शहराशी एकरूप झालेल्या आठ गावांना शहरात घेतले जावे, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

त्यावेळी उपस्थित असलेल्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (क्रमांक १) गोविंदराज व प्रधान सचिव (क्रमांक २) असीम गुप्ता यांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करावी, आठ गावांना घेऊन हद्दवाढ करता येईल का? याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांची दिली.

शिष्टमंडळाने आधी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, असा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनीही त्यास सहमती दिली.

आता पुढे काय होणार?

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश क्षीरसागर हे महापालिका प्रशासकांना आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा आणि तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी करणार आहेत. त्यानंतर प्रशासक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अभिप्राय घेतील. त्यानंतर नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

या गावांचा होणार समावेश..

शहराशी एकरुप झालेले पाचगाव, कळंबा, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, मोरेवाडी ही सहा पूर्ण गावे; तसेच बालिंगा व पाडळी खुर्द या दोन गावांचे मूळ गावठाण सोडून कोल्हापूर शहराला जोडलेला विस्तारित भाग यांना नवीन प्रस्तावात समावेश राहणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय, तसेच त्यांच्या भावना जाणून घेतल्याशिवाय हद्दवाढ केली जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. ग्रामीण भागातील जी भूमिका आहे तीच आमचीही आहे. त्यामुळे आमचीही मते जाणून घ्यावीत, मगच निर्णय घेतला जावा. - आमदार चंद्रदीप नरके

ग्रामीण जनता आमची दुष्मन नाही; पण शहराच्या विकासाचा विचार करता हद्दवाढ होणे आवश्यक आहे. म्हणून ग्रामीण भागातील नेते, कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेचा विषय न करता सामोपचाराने मार्ग काढण्यास पुढे आले पाहिजे. - आमदार राजेश क्षीरसागर

Web Title: Start the process of extending Kolhapur's boundaries with eight villages, Chief Minister Devendra Fadnavis suggests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.