दशरथ आयरे ।अणुस्कुरा : आपल्या गावातील रस्त्यात असलेली टेकडीची अडचण व त्यामुळे झालेला पत्नीचा मृत्यू यामुळे पेटून उठलेला बिहारमधील दशरथ मांझी सर्वांच्याच परिचयाचा आहे. २५ फूट उंचीचा डोंगर हातोडा-चिन्हीने फोडून रस्ता करणाऱ्या दशरथ यांच्या जीवनावर मांझी-द माउंटनमॅन हा चित्रपटही प्रसिद्ध होऊन गेला. असेच एक माउंटनमॅन शाहूवाडी तालुक्याच्या डोंगरी व दुर्गम भागातील कांटे या गावातील ८0 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे प्रसिद्धीस आले आहेत.
आपल्या परिवाराच्या उपजीविकेसाठी गेल्या ४0 वर्षांपासून एकट्याने रात्रंदिवस राबून खडकाळ डोंगर फोडून चार एकर शेतजमीन तयार केली. त्या जमिनीत ऊस व मका पीक जोमाने बहरले आहे.चाळके २0-२२ वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले. परिणामी, कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली. उदरनिर्वाहाचे साधन काहीच नव्हते. होता फक्त वडिलोपार्जित काळ्या दगडांचा डोंगर.
रोजगार मिळेना. कुटुंबाची उपासमार होऊ लागली. त्यामुळे त्यांनी ठरवले की, या डोंगराशी दोन हात करायचे आणि ते कामाला लागले. त्या दिवसापासून त्यांचे घण, सुतकी, टिकाव, फावडे घेऊन काळ्या दगडांशी टक्कर देणे सुरू झाले. दगड-धोंड्यांशी चाललेला हा संघर्ष गेली ४0 वर्षे आजही सुरूच आहे. सकाळी उठायचे ते थेट दगडाला भिडायचे. रस्त्याने ये-जा करणाºया लोकांनी त्यांना वेड्यात काढले; पण दुर्लक्ष करीत ते राबतच राहिले. पत्नीने आणलेली भाकर खाताना तेवढाच काय तो घडीभर विसावा. आठवड्यातून एक दिवस दुसºयाच्या शेतावर पत्नीसोबत मजुरीला जायचे व त्याच पैशांवर घरखर्च भागवायचे हा त्यांचा नियम आजही कायम आहे.
सतत ४0 वर्षे राबून चार एकर शेतजमीन तयार केली. या जमिनीत पिके घेण्यासाठी त्यांच्याबरोबर मुलगाही साथ देत आहे. उर्वरित डोंगर फोडण्याचे काम आजअखेर सुरूच आहे. चाळके मामांनी आयुष्यभर चप्पल घातलेले नाही. वर्षातून दोन वेळाच ते दाढी करतात. नवीन कपडे फक्त दिवाळी व होळीलाच घालतात, अशी साधी राहणी. मात्र, आता डोलणारी पिके पाहून कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. आता हातात पूर्वीसारखी ताकत राहिली नाही. शरीर थकले आहे. तरीपण देहात जीव असेपर्यंत या डोंगरातील दगडांची माती करण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.80 वर्षीय आनंदा लक्ष्मण चाळके हे शाहूवाडी तालुक्यातील कांटे येथील रहिवासी.40 वर्षांपासून कच्च्या दगडांचा खडकाळ डोंगर फोडून तयार केली चार एकर शेतजमीन20 वर्र्षांचे असताना मोलमजुरीसाठी मुंबईला गेले; पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना गावी परतावे लागले