युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:27 AM2019-02-19T00:27:22+5:302019-02-19T00:41:37+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी अखेर भाजप-शिवसेनेची युती सोमवारी जाहीर झाल्यामुळे विधानसभेसाठी काही इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले असले तरी कार्यकर्त्यांतून या युतीचे स्वागतच झाले. मात्र, भाजपने भावी आमदार म्हणून हवा दिलेल्या इच्छुकांचा पत्ता कट झाला. लोकसभेच्या दोन्ही जागांपैकी

Shiv Sena big brother in Kolhapur district: strength of the candidates of the Lok Sabha increased | युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ

युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांचा पत्ता कट : कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ- कार्यकर्त्यांमध्ये समाधान लोकसभेच्या उमेदवारांची ताकद वाढली

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी अखेर भाजप-शिवसेनेची युती सोमवारी जाहीर झाल्यामुळे विधानसभेसाठी काही इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले असले तरी कार्यकर्त्यांतून या युतीचे स्वागतच झाले. मात्र, भाजपने भावी आमदार म्हणून हवा दिलेल्या इच्छुकांचा पत्ता कट झाला. लोकसभेच्या दोन्ही जागांपैकी कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे राहील, हे स्पष्टच आहे. हातकणंगलेची जागा मिळण्यासाठी भाजप प्रयत्न करण्याची शक्यता आहे. परंतु ती मिळाली नाही तरी भाजपला वाईट वाटायचे कारण नाही. कारण या पक्षाकडे या घडीला लढण्यासाठी ताकदीचा उमेदवारच नाही. विधानसभा निवडणुकीत मात्र दहापैकी सहाही विद्यमान आमदारांच्या जागा शिवसेनेकडे राहणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनाच भाजपचा मोठा भाऊ असेल.

युतीचा मानसिकदृष्ट्या जास्त फायदा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना होईल. गेल्या निवडणुकीत त्यांनी मोदी लाटेत जोरदार धडक दिली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आजही मंडलिक यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जास्त प्रेम असले तरी एकदा युती झाल्यावर त्यांना व पक्षालाही सवतीच्या मुलीबरोबरचे प्रेम परवडणार नाही. कारण या निवडणुकीत एकेक जागा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

शिवसेनेला खासदारकीच्या संख्येत फारसा रस नसतो; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरची जागा जिंकण्याचे स्वप्न होते. त्यामुळे सेनाही या जागेबाबत आग्रही असेल. या निवडणुकीत भाजप युतीशी किती प्रामाणिक राहणार हाच कळीचा मुद्दा असेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आज जरी शिवसेना आपणच लढवणार असे म्हणत असली तरी ही जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने देव पाण्यात घातले आहेत. त्यामुळे ही जागा आपल्याकडे घेऊन तेथून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत किंवा निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांचाही विचार केला जाऊ शकतो. असे झाले तर उमेदवारी मिळणार म्हणून शिवसेनेत अगोदरच जाऊन फज्जा शिवलेल्या धैर्यशील माने यांची मोठी अडचण होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत दहापैकी सहा विद्यमान आमदारांच्या जागा शिवसेनेकडे व दोन भाजपकडे जाणार हे स्पष्टच आहे.

सासूसाठी वाटून घेतले..
कोल्हापूर उत्तर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांत सासूसाठी वाटून घेतले आणि सासूच वाटणीला आली, अशी अवस्था पालकमंत्र्यांची होणार आहे. उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व पालकमंत्री पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. काँग्रेसवाल्यांनी जेवढे आरोप केले नाहीत तेवढे गंभीर आरोप क्षीरसागर यांनी मंत्री पाटील यांच्यावर केले. शिवाय क्षीरसागर यांच्या पराभवासाठीही वाट्टेल ते करू अशीच भाजपची रणनीती होती. हीच स्थिती राधानगरी मतदारसंघातही आहे. तिथे आमदार प्रकाश आबिटकर यांनाही त्यांनी जोरदार विरोध केला. त्यांनी या मतदारसंघात एवढी विकासकामे केली की सगळ्यांना स्वत: मंत्री पाटील हेच या मतदारसंघातून निवडणूक लढवतात की काय, असे वाटत होते.

महेश जाधव, अनिल यादव, सत्यजित कदम, राहुल देसाई यांचा पत्ता कट
भाजपकडून विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून कोल्हापूर उत्तरमधून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक सत्यजित कदम, शिरोळमधून अनिल यादव यांनी तयारी सुरू केली होती; परंतु युती झाल्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह लागले. भाजपकडून राधानगरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनाही हवा दिली होती, परंतु त्यांचेही दरवाजे बंद झाले. राहुल देसाई यांनाही पक्षाने प्रोजेक्ट केले होते.

दक्षिणेत भाजप-राष्ट्रवादीची मैत्री
दक्षिण मतदारसंघात सध्यातरी भाजप व काँग्रेस असे दोनच गट आहेत. त्यातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या विरोधात उघड काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे खासदार महाडिक हे चुलतभाऊ असल्याने ते पक्षाशी प्रामाणिक राहणार की नात्याशी अशी अडचण असेल. परंतु तिथे भाजप राष्ट्रवादीच्या व काँग्रेस शिवसेनेच्या गळ्यात गळे घालणार हे स्पष्टच आहे.
नरकेंना पाठबळ : करवीर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत युती झाली नसती तर आमदार चंद्रदीप नरके यांच्या अडचणी वाढल्या असत्या. आता त्यांना भाजपचे पाठबळ मिळू शकेल.

कागलमध्ये काय...
कागल व चंदगड हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता ठळक आहे. कागलमधून समरजित घाटगे व चंदगडमधून रमेश रेडेकर किंवा अशोक चराटी हे संभाव्य उमेदवार असू शकतील. कागलमध्ये या घडीला मंडलिक-संजय घाटगे हे गट शिवसेनेत आहेत. आता समरजित घाटगे यांचेही बळ मंडलिक यांच्या मागे राहील. अशा स्थितीत संजय घाटगे यांच्यापुढे अपक्ष लढण्याशिवाय गत्यंतर नाही. चंदगडमध्ये संग्राम कुपेकर यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभारणार आहे.
 

शाहूवाडीत तिढा
शाहूवाडी मतदारसंघ शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्या वाट्याला जाणार आहे. तिथे पालकमंत्री पाटील यांनी विनय कोरे यांना ताकद दिली आहे. शाहूवाडी व हातकणंगले या जागा जनसुराज्यसाठी सोडायच्या, असेही जागा वाटप पालकमंत्र्यांनी जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे आता शाहूवाडीत कोरे यांना मदत करण्यात त्यांना अडचण येणार आहे. तीच स्थिती हातकणंगलेमध्ये राजीव आवळे यांच्याबाबतीत होणार आहे.

कुणाकडे राहतील कुठल्या जागा

लोकसभा
कोल्हापूर : शिवसेना
हातकणंगले : शिवसेना-भाजप समान संधी
विधानसभा
कोल्हापूर उत्तर :
शिवसेना (राजेश क्षीरसागर)
च्करवीर :
शिवसेना (चंद्रदीप नरके)
राधानगरी :
शिवसेना (प्रकाश आबिटकर)
हातकणंगले :
शिवसेना (डॉ. सुजित मिणचेकर)
शिरोळ : शिवसेना (उल्हास पाटील)
शाहूवाडी :
शिवसेना (सत्यजित पाटील)
कोल्हापूर दक्षिण :
भाजप (अमल महाडिक)
इचलकरंजी :
भाजप (सुरेश हाळवणकर)
शिल्लक जागा :
कागल : संभाव्य भाजप (समरजित घाटगे)
चंदगड : संभाव्य भाजप
(रमेश रेडेकर-अशोक चराटी)
 

जनतेने सर्व ओळखले
पाच वर्षे काय हाल झाले याची सामान्य माणसाला कल्पना आहे. या पापात दोघेही सहभागी असल्याने युती झाली काय आणि नाही काय, कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जनतेने शिवसेना व भाजपच्या नेत्यांचे मुखवटे ओळखले आहेत.
- ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस
सर्व स्वार्थासाठी
सत्तेत राहून सरकारला शिव्या द्यायच्या आणि पुन्हा एकत्र यायचे, हे बाळासाहेब ठाकरे यांनी कदापि मान्य केले नसते. राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरे काय करू शकतात, हे महाराष्टÑाच्या जनतेसमोर आले.
- प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

पुन्हा सत्ता आणू
२०१४ चा अपवाद वगळता गेल्या ३0 वर्षांपासून युती अभेद्यच राहिली आहे. मधल्या काळात युती तुटल्याने कटुता निर्माण झाली होती; परंतु युतीने गेल्या २५ वर्षांत भ्रष्टाचार विरोधात व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित लढा दिला आहे. एकमेकांच्या हातात हात घालून पुन्हा केंद्र व राज्यात युतीचे सरकार आणण्यासाठी जिवाचे रान करू. - राजेश क्षीरसागर, आमदार

खूप आनंद झाला
गेले काही महिने भाजप आणि शिवसेनेची युती होईल, असा विश्वास आम्ही व्यक्त करत होतो. त्याप्रमाणे अखेर युती झाल्याने खूप आनंद झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीशी आमची युती खंबीरपणे लढून यशस्वीही होईल. कोल्हापूरबाबतच्या अनेक गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील.
- चंद्रकांत पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर

युती होणारच होती...
शिवसेना-भाजप यांची युती होणारच होती. फक्तजागा वाटपासाठी एकमेकांनी ताणवून धरले होते. आता तेही चित्र स्पष्ट झाले आहे; पण ही युती गृहीत धरूनच काँग्रेस-राष्टÑवादी व मित्रपक्षाने आपली वाटचाल सुरूठेवली आहे. फक्तआमच्यात कोण मित्रपक्ष सामील होते, त्यांना जागा किती द्यायच्या, याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका सुरू आहेत.
- प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

राज्याच्या हिताचा निर्णय
शिवसेना-भाजप युतीचा घेण्यात आलेला निर्णय हा महाराष्टÑासह हिंदुत्वाच्या हिताचा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वक आणि योग्य असा हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वसामान्य शिवसैनिकांनाही मान्य असून, त्यांच्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
- संजय पवार,
जिल्हाप्रमुख, शिवसेना

Web Title: Shiv Sena big brother in Kolhapur district: strength of the candidates of the Lok Sabha increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.