दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नव्हे, राजकीय पक्षांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका करणारे राजू शेट्टी म्हणजे सेना गेलेले पती, अशी अवस्था असून त्यांच्यामागे किती शेतकरी आहेत? तुमचा माणूस फुटला म्हणून भाजप बेमान कसे? सदाभाऊ फुटले नसते तर ते आमच्यासोबतच असते, अशी टीका राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.
बांबू शेती लागवडीबाबत पटेल संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करत आहेत. मंगळवारी ते कोल्हापुरात आले होते. पटेल म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांनी दोन महिने आंदोलन करून काय पदरात पाडून घेतले? केवळ विरोधाला विरोध करणे एवढाच कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील ४० टक्के शेती ही करार पध्दतीनेच केली जाते. हा कायदाही ऐच्छिक आहे, मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू आहे.
पृथ्वीवर प्रदूषण वाढत असल्याने बहुउपयोगी बांबूच्या लागवडीसाठी आपली परिक्रमा सुरू आहे. बांबूचे एक झाड वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देते. यापासून इथेनॉलसह अनेक वस्तू तयार करता येतात. केंद्र सरकारच्या नॅशनल बांबू मिशन, अटल बांबू मिशन व रोजगार हमीमधून बांबूला पैसे दिले जातात. एकरात एक लाख झाडे लावता येतात. चौथ्या वर्षापासून त्याचे उत्पन्न सुरू होते. शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे, असे आवाहन पाशा पटेल यांनी केेले.
यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भगवान काटे, विजय जाधव आदी उपस्थित होते.
मग पवार गैरहजर का?
स्वत:ला शेतकऱ्यांचा आत्मा समजणारे शरद पवार शेतकरी विधेयकावेळी राज्यसभेत का उपस्थित नव्हते. आता मात्र दुहेरी भूमिका घेऊन राजकारण सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.