कोल्हापुरातील राजाराम, शिंगणापूर बंधारा गेला पाण्याखाली; पावसाची रिपरिप सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 15:47 IST2023-07-07T15:46:44+5:302023-07-07T15:47:05+5:30
धोकादायकरित्या वाहतूक सुरु

कोल्हापुरातील राजाराम, शिंगणापूर बंधारा गेला पाण्याखाली; पावसाची रिपरिप सुरुच
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जूनमहिना संपला तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. परिणामी धरणपाणीसाठ्यात मोठी घट झाली. मात्र काही दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. अशातच आज पंचगंगा नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे मार्गावरील वाहतूक बंद झाली.
राजाराम बंधारा सकाळी ११.२० वाजता पाण्याखाली गेला आहे. तर त्या पाठोपाठ शिंगणापूर बंधारा ही पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्यावर १६.७ इंच पाणी पातळी आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने कसबा बावडा, वडणगे, निगवे दुमाला वाहतूक बंद झाली आहे. तसेच शिंगणापूर बंधाऱ्यावरील वाहतूक ही बंद झाली आहे. मात्र नागरिक अशातही धोकादायकरित्या वाहतूक करीत आहेत.
राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र, अजूनही दमदार आणि जोरदार पाऊस नसल्याने पंचगंंगेसह सर्वच नद्या, तलावांतील पाणीपातळी खालावलेलीच आहे. परिणामी, सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पेरणीच्या कामाला समाधानकारक वेग आला नाही. सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्याने ऊस पिकाची वाढ खुंटली आहे.