रस्ता नाही, तर मतदान नाही; कोल्हापुरातील 'या' गावाने दिला निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:30 IST2026-01-20T19:30:24+5:302026-01-20T19:30:37+5:30
एकजुटीचा निर्धार

रस्ता नाही, तर मतदान नाही; कोल्हापुरातील 'या' गावाने दिला निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
गोकुळ शिरगाव : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामुळे तामगावला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केल्याने तामगाव (ता. करवीर) येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर शनिवारी रात्री हनुमान मंदिरात झालेल्या ग्रामसभेत, जोपर्यंत रस्त्याचा ठोस प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
विमानतळ प्रशासनाने पर्यायी रस्त्याची सोय न करताच जुन्या रस्त्यावर भिंत बांधून तो बंद केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत ‘हुकूमशाही’ पद्धतीचा असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे शाळकरी मुले, नोकरीला जाणारे तरुण आणि वृद्ध नागरिकांना आता तब्बल ८ ते ९ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावेळी महेश पिंपळे, हेमंत पाटील, राजेंद्र पावंडे, माणिक जोंधळेकर, विश्वास तरटे, विक्रम ढाले, कृष्णात जोंधळेकर, तानाजी सासणे, श्रीधर गवते, अनिल पाटील, सुभाष सुतार, अभिजीत मोहोळकर, सुंदर कांबळेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकजुटीचा निर्धार
निवडणुकीच्या काळात प्रशासनावर दबाव टाकण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत, 'रस्ता नाही, तर मतदान नाही' असा पवित्रा संपूर्ण गावाने घेतला आहे. जोपर्यंत पर्यायी किंवा कायमस्वरूपी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत कोणीही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.