Kolhapur: गोकुळ संलग्न एकाही पात्र दूध संस्थेवर अन्याय होणार नाही, सहायक निबंधकांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:37 IST2026-03-31T12:37:16+5:302026-03-31T12:37:31+5:30
साहेब जिवंत माणसाला जाळण्याचे पाप करू नका, मेळाव्यानंतर ‘त्या’ ११०८ संस्थांनी दिले निवेदन

Kolhapur: गोकुळ संलग्न एकाही पात्र दूध संस्थेवर अन्याय होणार नाही, सहायक निबंधकांनी दिली ग्वाही
कोल्हापूर : कायद्याने सांगितलेली अवसायनाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. यामध्ये एकाही पात्र दूध संस्थेवर अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, अशी ग्वाही सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी दिली. संबंधित संस्थांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नोटिसीतील मुद्दे व वेळेनुसार आपले म्हणणे सादर करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘दुग्ध‘ विभागाने १३२० दूध संस्थांना ऑक्टोबर २०२३ मध्ये अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढले होते. त्यातील ११०८ संस्था ‘गोकुळ’शी संलग्न आहेत. अवसायन आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्याने संस्थांमध्ये अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सोमवारी या संस्थांचा मेळावा झाला.
वाचा: ‘११०८’ संस्थांबाबत गुंता, तोपर्यंत ‘गोकुळ’ मतदार यादी तयार करा, विभागीय उपनिबंधकांच्या सूचना
यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, दूध उत्पादकांच्या जिवावर ‘गोकुळ’ची उभारणी झाली आहे. त्या संस्थांना अवसायनात काढून मतदानापासून वंचित ठेवणे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अपमान आहे. काही अपप्रवृत्तीमुळे संस्थांवर ही वेळ आली आहे. दुग्ध विभागानेही तातडीने संबंधित संस्थांचे म्हणणे घेऊन पात्र संस्थांचा समावेश करून घ्यावा.
यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह संचालक उपस्थित होते. दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर बारा तालुक्यांतील संस्था प्रतिनिधी जाऊन सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांना निवेदन दिले.
शौमिका महाडिक यांची उपस्थिती
दूध संस्थांच्या मेळाव्याला संचालिका शौमिका महाडिक या उपस्थित राहिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आपण, या संस्थांसोबत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
अदृश्य शक्तीचा निषेध
मेळाव्यात दूध संस्थांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते. ज्या अदृश्य शक्तीमुळे ‘गोकुळ’सह दूध संस्थांची बदनामी सुरू त्यांचा निषेध करीत असल्याचे संस्था प्रतिनिधींनी सांगितले.
साहेब जिवंत माणसाला जाळण्याचे पाप करू नका
विजयसिंह सरनोबत (आसुर्ले) म्हणाले, साहेब १९७८ ची आमची संस्था आहे, कोणी तरी तक्रार करते म्हणून आमचा हक्क हिरावून घेऊ नका. ‘साहेब, जिवंत माणसाला मारून जाळू नका, मोठे पाप लागेल, त्यापेक्षा मेलेल्याला जिवंत केले तर पुण्य लागेल, असे भावनिक आवाहन ‘दुग्ध’ विभागाला केले.
अवसायनाचा कायदा काय सांगतो...
- नवीन नोंदणी केली, पण काम सुरू नाही
- काम सुरू होऊन मध्यंतरी बंद पडले
- भागभांगडवल पाचशे रुपयांपेक्षा कमी झाले
- उपविधीप्रमाणे कामकाज सुरू नाही