कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच - हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:17 IST2026-02-05T13:15:41+5:302026-02-05T13:17:14+5:30
'विरोधक अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका'

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच - हसन मुश्रीफ
गडहिंग्लज : दोन्ही राष्ट्रवादीमधील पहिले ऐक्य चंदगडमध्ये व नंतर पुणे जिल्ह्यात झाले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापुढेही कायमचे एकत्र राहणार आहोत. भविष्यात चंदगड व गडहिंग्लज मतदारसंघ वेगळे झाले तरी दोन्ही आमदार राष्ट्रवादीचेच असतील. जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता येईल. परंतु, अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असा विश्वास वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
नूल येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तालुक्यातील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यानिमित्ताने कुपेकर बहिण-भाऊ, चव्हाण काका-पुतणे एकत्र आले. स्व. कुपेकरांनी बांधलेला पक्ष पुन्हा मजबूत झाला, असेही त्यांनी नमूद केले. माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, स्व. कुपेकर, नरसिंगराव पाटील व अजितदादांना खरी श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे.
वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे १२ तालुक्यांत २४ रंग; कुणी दिली पक्षाला सोडचिठ्ठी, कुणाची विरोधकांशी हातमिळवणी
डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, मुश्रीफांमुळेच आम्ही एकत्र आलो. त्यामुळे कार्यकर्ते व जनतेतील गैरसमज दूर झाले. एक-दोन कार्यकर्ते बाहेर गेले तरी जनता राष्ट्रवादीसोबतच आहे.
प्रकाश चव्हाण म्हणाले, केवळ मुश्रीफांच्या सहकार्यामुळेच गडहिंग्लज कारखान्याचे चाक फिरत आहे. त्यांच्यामुळेच आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून अनेक कुटूंबे एकत्र आली आहेत.
यावेळी उदय जोशी, जयसिंग चव्हाण, भैरू पाटील-वाघराळकर यांचेही भाषण झाले.
सभेस गडहिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, वरदशंकर वरदापगोळ, डॉ. यशवंत चव्हाण, रामराज कुपेकर, संतोष पाटील-कडलगेकर आदींसह सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्धे राज्यही देतील
विरोधकांकडून लाखाची नव्हे तर कोटीची भाषा सुरू आहे. अर्धे राज्य देण्याचे आश्वासनही देतील. परंतु, त्याला बळी पडू नका, असे आवाहन नंदिनी बाभूळकर यांनी केले.
अजितदादांना माझा शब्द, मात्र जोशी नाव विसरले !
चंदगड एकच राहिला तर नंदिनी बाभूळकर किंवा राजेश पाटील यांच्यापैकीच एक आमदार होईल असे उदय जोशी यांनी भाषणात नमूद केले. मात्र, चंदगड, गडहिंग्लज वेगळे झाले तर राष्ट्रवादीला दोन आमदार आणि चंदगड एकच राहिले तरीही आमदार राष्ट्रवादीचाच होईल. असा शब्द आपण अजितदादांना अडकूरच्या सभेत दिला होता. परंतु, जोशींनी नाव जाहीर करायचे विसरले, असा चिमटा माजी आमदार राजेश पाटील यांनी काढला.