कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद कोणत्या कायद्यात?, पाटबंधारे विभागाला विचारला 'लोकमत'ने जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:22 IST2026-03-21T12:20:37+5:302026-03-21T12:22:42+5:30
महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि स्मिता माने यांच्यात जोरदार खडाजंगी

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद कोणत्या कायद्यात?, पाटबंधारे विभागाला विचारला 'लोकमत'ने जाब
कोल्हापूर : ऐन उन्हाळ्यात थकबाकीच्या नावाखाली तमाम कोल्हापूरकरांच्या तोंडचे पाणी पळवू पाहणाऱ्या पाटबंधारे विभागाला 'लोकमत'ने खडसावून जाब विचारला. या विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांना उलट-सुलट प्रश्न विचारले असता, त्यांनी भलतीच उत्तरे दिली.
कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा उपसा बंद केल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी त्यांच्या कक्षात शुक्रवारी दुपारी बैठक घेतली. त्यावेळी महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि स्मिता माने यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. बैठक संपल्यानंतर महापौर निकम व कार्यकारी अभियंता माने यांची पत्रकारांनी भेट घेतली. त्यावेळी लोकमत प्रतिनिधींनी जाब विचारला असता झालेला संवाद जसाचा तसा.
'लोकमत'चा प्रश्न : थकबाकी वसुलीकरिता शहराचा पाणीपुरवठा बंद करावा, असे कोणत्या कायद्यात सांगितले आहे?
माने : इरिगेशन कायद्यात सांगितले आहे.
प्रश्न : कोणते कलम आहे ते सांगता येईल का?
माने : आम्हाला प्रश्न विचारता तसे थकबाकी भरा म्हणून तुम्ही महापालिकेला का सांगत नाही..?
प्रश्न : तुम्ही जलअभियंता कार्यालय सील करू शकला असता ना..?
माने : नाही.. वसुलीसाठी पाणीपुरवठाच खंडित करायचा होता.
प्रश्न : थकबाकी वसुलीकरिता पाणीउपसा केंद्र सील करणार असल्याची कल्पना महापालिका प्रशासनाला दिली होती का?
माने : आमदार अमल महाडिक यांच्याबरोबर तीन-चार बैठका झाल्या आहेत, त्यांनी कल्पना दिली होती. महाडिक साहेबांशी सगळी चर्चा झालीय.
अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या विधानास आक्षेप घेतात... नाही नाही असे उलटं काही सांगू नका असे त्या सांगतात. गटनेते मुरलीधर जाधवदेखील आक्षेप घेतात.
माने : मॅडम तुम्हाला माहीत आहे काय? तुम्ही प्रत्येक मीटिंगला होता काय, तीन चार बैठका झाल्या आहेत. हर्षजित घाटगेंना (जलअभियंता) माहीत आहे. मग तुम्ही कशाला बोलत आहात.
प्रश्न : आमदार अमल महाडिक यांनी कनेक्शन तोडायला सांगितले होते का?
माने : हा विषय झाला आहे. अमल महाडिक यांना थकबाकीबाबत सांगितले आहे. ते आमच्या मंत्र्यांशीही बोलले आहेत. त्यावेळीच कारवाईचे ठरले हाेते. महापालिका काही करत नसेल तर पाणीपुरवठा खंडित करा, महापालिकेचे अधिकारी पळू देत असे अमल महाडिक यांनी सांगितले होते.
मानेंचे आरोप.. महाडिकांचे स्पष्टीकरण
महानगरपालिका थकबाकीची रक्कम भरण्यासाठी काही करत नसेल तर पाण्याचे कनेक्शन कट करा असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले होते, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी शुक्रवारी महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत दिली. मात्र, माने यांच्या या वक्तव्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी आपण असे काही सांगितले नाही असे स्पष्टीकरण दिले.
आमदार महाडिक 'लोकमत'शी बोलताना म्हणाले, पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर महानगरपालिकेकडे असलेल्या थकीत पाणीपट्टी रकमेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाटबंधारे खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचे सत्र सुरूच आहे. थकबाकीची रक्कम मोठी असल्यामुळे लवकरच मंत्री आणि मुख्यमंत्री स्तरावर समाधानकारक तोडगा काढला जाईल. महापालिकेच्या आर्थिक स्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेवर भुर्दंड बसणार नाही, याची काळजी घेतली जाईल. पाणीपुरवठा बंद करा असे मी सांगिलेले नाही.