Kolhapur ZP Election Voting 2026: राशिवडेत मतदानावेळी दोन गटात वाद, कार्यकर्ते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:35 IST2026-02-07T14:34:10+5:302026-02-07T14:35:03+5:30
दुपार पर्यंत पन्नास टक्के मतदान

Kolhapur ZP Election Voting 2026: राशिवडेत मतदानावेळी दोन गटात वाद, कार्यकर्ते भिडले
राशिवडे: येथे प्रभाग क्रमांक एकच्या मतदान केंद्रावर चुरशीने सुरू असलेल्या मतदानावेळी दोन गटात बाचाबाची झाली. यातून वाद झाल्याने मोठा जमाव जमला. राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तातडीने कारवाई करत जमाव पांगवला.
राशिवडे जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे येथे चुरशीने मतदान सुरू आहे. याठिकाणी दुपार पर्यंत पन्नास टक्के मतदान झाले होते. वृद्ध मतदारांना मतदान करण्यावरून दोन गटात वाद झाला. ही बातमी इतर कार्यकर्त्यांना समजताच मोठा जमाव जमला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. दरम्यान राधानगरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परीस्थिती नियंत्रणात आणली.
कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल पावणेनऊ वर्षांनी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समित्यांच्या १३६ जागांसाठी आज २६९१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज, शनिवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान सुरू आहे. काटेजोड लढती होत असलेल्या मतदारसंघात चुरशीने मतदान होत आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात सकाळी ११.३० पर्यंत २६.७६ टक्के मतदान झाले होते.
जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४३.९५ टक्के मतदान
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अभूतपूर्व उत्साहात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची व व्यवस्थेची पाहणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कागल तालुक्यातील कसबा सांगव, हातकणंगले तालुक्यातील येळगुड, रेंदाळ, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील मुडशिंगी येथील मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची खातरजमा केली.
दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण २ हजार ६९१ मतदान केंद्रांवर ४३.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील २३ लाख ४० हजार मतदारांपैकी ५ लाख २२ हजार ७३८ पुरुष मतदार, ५ लाख ५ हजार ८५९ स्त्री मतदार तसेच इतर ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण १० लाख २८ हजार ६०६ मतदारांनी मतदान केले.