महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:28 IST2025-05-30T16:27:27+5:302025-05-30T16:28:14+5:30
Kolhapur Crime News: एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे.

महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण
एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे.
एका महिलेला तिच्या कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून घरात कोंडून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा ही महिला साखळदंडाने बांधलेल्या आणि त्याला कुलूप लावलेल्या स्थितीत होती. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली.
दरम्यान, या महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी बांधून ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुटका करण्यात आली तेव्हा पीडित महिला ही बिकट अवस्थेत होती. तिला धड चालताही येत नव्हते. मी घराबाहेर पडून जाऊ नये म्हणून मला बांधून ठेवलं होतं, असा दावा या महिलेनं केला आहे. या महिलेचं वय सुमारे ४० वर्षे असून, ती गतिमंद असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला साखळदंडाने बांधून ठेवले होते, असे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले की, ही महिला भाचा, तिचे भाऊ आणि भावाची पत्नी यांच्यासोबत राहते. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बांधलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती ती महिला देत आहे. तिची प्रकृती बिघडलेली असल्याने तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.