दहशत माजविणाऱ्या गावगुंडांची गल्लीबोळांत 'वरात', कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांसमोर 'धुऊन' काढला दरारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:22 IST2025-06-12T12:20:52+5:302025-06-12T12:22:33+5:30

पोलिसी खाक्या दाखवताच हात जोडले

Kolhapur police chased the terror stricken village goons through the streets | दहशत माजविणाऱ्या गावगुंडांची गल्लीबोळांत 'वरात', कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांसमोर 'धुऊन' काढला दरारा

दहशत माजविणाऱ्या गावगुंडांची गल्लीबोळांत 'वरात', कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांसमोर 'धुऊन' काढला दरारा

कोल्हापूर : मित्राशी वाद घातलेल्या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गांधी मैदानाजवळ जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. ११) ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तिघे राहत असलेल्या वारे वसाहतीतून त्यांना तपासासाठी फिरवले. पोलिसांनी धुलाई करून केलेला विशेष पाहुणचार आणि स्वत:च्या गल्लीत आरोपी म्हणून फिरवल्याने गुंडांचा नूर उतरला. ओम चेतन आवळे (वय २२), ऋत्विक साठे आणि एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश होता.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीत राहणारा हर्षवर्धन उमेश मोरे (वय २७) याचा दहा दिवसांपूर्वी संभाजीनगर चौकात वैभव कुरणे याच्याशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. याची माहिती कुरणे याने ओम आवळे या मित्राला दिली. त्यानंतर ५ जून रोजी रात्री ओम आवळे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी पाठलाग करून गांधी मैदानाजवळ हर्षवर्धन याला मारहाण केली. त्याच्या दुचाकीची तोडफोड करून दहशत माजवली होती. शहरात मध्यवस्तीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाल्यानंतर पोलिस हल्लेखोरांच्या शोधात होते. यातील दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली, तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.

वारंवार सूचना देऊनही वारे वसाहत आणि परिसरातील तरुणांकडून गुंडगिरी वाढत असल्याने पोलिसांनी हा विषय गांभीर्याने हाताळला. ताब्यात घेतलेल्या तिघांचा पोलिस ठाण्यात विशेष पाहुणचार करण्यात आला. काही वेळ त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमत नव्हते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पुन्हा गुंडगिरी करणार नसल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील अन्य संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

स्वत:च्याच गल्लीत मान खाली

वारे वसाहतीत रुबाबात फिरून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बुधवारी दुपारी तपासासाठी त्यांच्या परिसरातून फिरवले. पोलिसांच्या गाडीतून उतरतानाच तोंड वाकडे करून विव्हळणाऱ्या तिघांकडे पाहताच परिसरातील नागरिकांना त्यांच्या विशेष पाहुणचाराचा अंदाज आला. त्यावेळी तिघेही मान खाली घालून चालत होते. वारंवार हात जोडून ते पोलिसांकडे माफी मागत होते. यातील ऋत्विक साठे हा चालताना टंगळमंगळ करीत होता. त्यावेळी पोलिसांनी आवाज वाढवून त्याच्या बकोटीला हात घालताच त्याचे उरलेसुरले अवसानही निघून गेले.

बेड्या, काढण्या बंद

चार-पाच वर्षांपूर्वी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बेड्या आणि काढण्या घालून किंवा दोरीने बांधून त्यांची धिंड काढली जात होती. यातून काहीवेळा संशयित आरोपींवर अन्याय व्हायचा. याचा संदर्भ घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता बेड्या, काढण्यांचा वापर होत नाही.

पोलिस अधिकाऱ्यांचा इशारा

आरोपींचे नातेवाईक आणि परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक ठिकाणी बोलवून पोलिसांनी आरोपींचे कारनामे सांगितले. १६ ते २० वयोगटातील मुलांना वेळीच समज दिली नाही तर हेच उद्या मोठे गुन्हे करतील. एकमेकांचे खून पाडतील. त्यानंतर पालकांनी पश्चाताप करून काहीच होणार नाही. गुंडगिरी करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिला.

Web Title: Kolhapur police chased the terror stricken village goons through the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.