Kolhapur ZP Election 2026: माघारीची यंत्रणा भारी, साम, दाम, दंडाची तयारी; मंगळवारी होणार लढतींचे चित्र स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:58 IST2026-01-24T15:58:12+5:302026-01-24T15:58:33+5:30
याद्या घेऊनच नेते बसले

Kolhapur ZP Election 2026: माघारीची यंत्रणा भारी, साम, दाम, दंडाची तयारी; मंगळवारी होणार लढतींचे चित्र स्पष्ट
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. ज्या पद्धतीने राज्य आणि जिल्हा पातळीवर कुणीही कोणत्याही पक्षाकडून, संघटनेत प्रवेश केले होते. त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातही किमान २० जणांनी पक्षांतर करत उमेदवाऱ्या मिळविल्या आहेत. परंतु हीच उमेदवारांची वाढलेली संख्या नेतेमंडळींची डोकेदुखी ठरत असून, त्यासाठी माघारीच्या जोडण्या लावण्यात नेते गुंतले आहेत. यासाठी साम, दाम, दंडाचा वापर केला जात असून, यामध्ये कितपत यश आले हे मंगळवारी दुपारी ३ नंतरच स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात भाजप आणि कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबतच दोन राष्ट्रवादी, शिंदेसेना, उद्धवसेना, जनसुराज्य शक्ती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्थानिक आघाड्या या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक पक्ष, संघटनांची ताकद आहे. त्यामुळे त्या ताकदीनुसार ज्यांनी त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. परंतू फार कमी ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने अनेक इच्छुकांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे यातील मातब्बर इच्छुक शड्डू ठोकून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे कोणाची उमेदवारी राहिली तर कोणाला फटका बसेल याची गणिते मांडून त्यानुसार नेते याद्या घेऊन बसले आहेत. यातील कोण इच्छुक किंवा त्यांच्या घरातील कोण कुठे नोकरीला आहे. कोणाचा व्यवसाय काय आहे. जिल्हा बॅंक आणि ‘गोकुळ’शी त्यांचा काही संंबंध आहे का, कोण कोणाच्या शिक्षण संस्थेत नोकरीला आहे. कोणाचा व्यवसाय कोणावर अवलंबून आहे अशी इत्यंभूत माहिती काढून त्यानुसार विनंती, सूचना, आदेश, इशारा या टप्प्याटप्प्याने माघारीसाठी यंत्रणा कामाला लावली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठी तब्बल ६५९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत, तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी तब्बल १२११ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या आकडेवारीवरूनच नेत्यांसमोर इच्छुकांच्या माघारीचे फार मोठे आव्हान असल्याचे दिसून येते.
करवीर तालुक्यात सर्वाधिक अर्ज
करवीर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२ जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि २४ पंचायत समिती सदस्य आहेत. त्यामुळे याच तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक म्हणजे १२६ आणि पंचायत समितीसाठी १९४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
- जिल्हा परिषदेच्या जागा - ६८
- अर्ज दाखल केलेले उमेदवार - ६५९
- पंचायत समितीच्या जागा - १३६
- अर्ज दाखल केलेले उमेदवार - १२११
डमी अर्जांची आपोआपच माघार
या अर्जांमध्ये अधिकृत उमेदवारांच्या घरातील अनेकांचे डमी अर्ज असतात. ते आपोआपाच मागे घेण्यात येतात. जिल्हा परिषदेसाठी किमान १५० आणि पंचायत समित्यांसाठी किमान पाचशेहून अधिक डमी अर्ज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अर्ज मागे घेण्यासाठी काही ताकद लावावी लागणार नाही. परंतु इतर उपद्रवी उमेदवारी मागे घेण्यासाठी मात्र जोडण्या घालाव्या लागणार आहेत.