कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ होणारच; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:08 IST2025-06-23T12:07:31+5:302025-06-23T12:08:05+5:30

हद्दवाढ प्रस्तावात पिरवाडीचा चुकून उल्लेख - क्षीरसागर 

Kolhapur city limits to be expanded bench to be formed says Guardian Minister Prakash Abitkar | कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ होणारच; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

कोल्हापूर शहराची हद्दवाढ, खंडपीठ होणारच; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आठ गाव महापालिका हद्दीत घेण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असून, सर्वांना बरोबर घेऊन हद्दीवाढीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिली.

आबिटकर म्हणाले, सीमा भागातील प्रश्नाची सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. सीमाप्रश्नी जी उच्चाधिकार समिती स्थापन झालेली आहे, ती सातत्याने या प्रश्नाचा आढावा घेत आहे. या भागातील मराठी बांधवांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापूर खंडपीठाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, खंडपीठाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

हद्दवाढ प्रस्तावात पिरवाडीचा चुकून उल्लेख - क्षीरसागर 

कोल्हापूर : हद्दवाढीच्या प्रस्तावात पिरवाडी या गावाच्या नावाचा चुकून उल्लेख झाला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी या गावांसह आठवे गाव म्हणून नवी उजळाईवाडी या गावाचा समावेश करण्याचे ठरले होते. याबाबत तत्काळ महानगरपालिका प्रशासकांना दिलेल्या पत्रात सुधारणा करून नवी उजळाईवाडी या गावाचा हद्दवाढीत समावेश करण्याबाबत सुधारित पत्र आज, सोमवार रोजी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अलमट्टीची उंची वाढवू देणार नाही

अलमट्टी धरणाच्या उंचीसंदर्भात नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरींनी कर्नाटक राज्याच्या जलसंपदा सेक्रेटरींशी चर्चा केली आहे. या चर्चेत अलमट्टी धरणाची उंची ५१७.५ पर्यंत स्थिर ठेवण्यावर एकमत झाले आहे. अलमट्टी धरणाची उंची ५१८ पर्यंत गेली; तर कोल्हापूरला महापूर येईल, त्यामुळे त्यापुढे ही उंची काही झाले तरी वाढवू देणार नाही. परंतु पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला तर यंदा कोल्हापूरला महापूर येणार नाही. त्यासाठी कर्नाटक सरकारशी महाराष्ट्र जलसंपदाचे सेक्रेटरी तसेच अधिकारी योग्य समन्वय राखून आहेत.

Web Title: Kolhapur city limits to be expanded bench to be formed says Guardian Minister Prakash Abitkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.