कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची उसळी, क्विंटलला ४६०० रुपये उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 14:46 IST2019-09-20T14:45:11+5:302019-09-20T14:46:32+5:30
कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क्विंटलला ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची उसळी, क्विंटलला ४६०० रुपये उच्चांकी दर
कोल्हापूर : कांद्याच्या दरातील वाढ सुरूच असून, गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निघालेल्या सौद्यांत क्विंटलला चार हजार ६०० रुपये उच्चांकी दर मिळाला. कांद्याने घेतलेली ही उसळी गेल्या वर्षभराच्या हंगामातील सर्वांत मोठी ठरली असून, एका दिवसात दरात एका क्विंटलला ८०० रुपयांची वाढ झाली आहे.
जीवनावश्यक गटात मोडणारा कांदा निवडणूक काळात नेहमीच केंद्रस्थानी येतो. १० वर्षांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून कांदा आणि निवडणुका हातात हात घालूनच येत आहे. आताही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होत असताना कांद्याच्या दरानेही जोरदार उसळी घेतली आहे.
महापूर आणि कोरडा दुष्काळ यांमुळे खरीप कांद्याचे पीक खराब झाल्याने कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे, असे म्हटले जात असले तरी ऐन निवडणुकीत मतदारांना रडविण्याची जबाबदारी कांद्याने उचलली आहे.
राज्यभरात गुरुवारी निघालेल्या सौद्यांत किलोचा किमान दर ४० रुपये राहिला आहे. कोल्हापूर ही तशी कांद्याची बाजारपेठ नसली तरी श्रीगोंदा, नाशिक, पुणे, नगरमधून कोल्हापुरात कांद्याची आवक होते. दर चांगले मिळत असल्याने व्यापारी प्राधान्य देत असल्याचे दिसते.
गुरुवारी सकाळी समितीत निघालेल्या सौद्यावेळी १० किलोंचा दर ४६० रुपये निघाला आहे. किमान भाव ३४० रुपये राहिला. बुधवारी निघालेल्या सौद्याला हाच दर सर्वाधिक ३८० असा होता; तर किमान २८० रुपये प्रति १० किलो दर होता. एकाच दिवसात किलोमागे आठ, तर १० किलोेंमागे ८०० रुपयांची वाढ झाली आहे.
आवक निम्म्यावर
खरिपातील कांदा कुजल्यामुळे मुळातच बाजारात आवक कमी झाली आहे. चाळीतील साठवणुकीच्या कांद्यावरच पुरवठा व्यवस्थापन सांभाळले जात आहे. त्यामुळे सौद्यासाठी कांदे भरून येणाऱ्या ट्रकचीही संख्या निम्म्याने कमी झाली आहे. कोल्हापुरात ४० ते ५० ट्रकऐवजी २० च ट्रक आले. त्यातून अवघी ३११० पोतीच कांद्याची आवक झाली.